कोळा/वार्ताहर सांगोला तालुक्यातील कोळा जुनोनी ग्रामीण भागांतून कामासाठी स्थलांतर करणाऱ्या शेकडो नागरिकांनी कोरोना विषाणुजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे भागातून आपल्या मूळ गावी परतायला सुरवात केल्यामुळे परत आलेल्या नागरिकांभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाला आता ग्रामीण भागांमधूनही या आजारासंदर्भात जनजागृती करून काळजी घेण्याची वेळ आली आहे. दररोज वेगवेगळ्या ट्रॅव्हल्सने खाजगी वाहनाने गावकरी गावाकडे परतू लागले आहे आरोग्य प्रशासनाने त्यांची चाचणी घेणे गरजेचे आह याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
कोरोनो या विषाणूजन्य आजारामुळे सर्वत्र भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. या आजाराचा संसर्गाचा प्रादुर्भाव व फैलाव होणार नाही याची काळजी घेण्याकरिता प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना व खबरदारी घेण्यात येत आहे. या संसर्गजन्य आजाराचा फैलाव होणार नाही याकरिता राज्य शासनाने शाळा, सुट्या देत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करून कोरोना आजाराला पायबंद घालण्याची तयारी केली आहे.
त्या दृष्टीने कोळ्याचा शुक्रवारचा आठवडा बाजार रद्द केला सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर प्रतिबंध घातले आहेत व या आजाराबाबत जनजागृती करण्याकरिता कोळा ग्रामपंचायत आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. या स्थितीत ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना कोरोना विषाणुजन्य आजारासंदर्भात माहिती झाली आहे. जो तो नागरिक आपल्या परीने या आजारापासून लांब राहण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करीत आहे.काही दिवसांपासून कोरोना विषाणूची दशहत निर्माण झाल्याने गर्दीच्या ठिकाणची कामे बंद होत आहेत. शाळा, महाविद्यालयांना सुट्या जाहीर केल्याने विद्यार्थीही गावाकडे परतत आहेत. कोरोना विषाणूमुळे गावकरी शहरी भागात जाणेदेखील टाळत आहेत. आता आपल्याच गावातील आपले नातेवाईक गावात दाखल होत असल्याने त्यांची शंका निर्माण होत असल्याचे चित्र आहे
कोळ्यात परतलेल्या गावकऱ्यांबाबत संशय..
दरम्यान, कोळा कराडवाडी कोंबडवाडी जुनोनी भागांमधून कामासाठी मुंबई, पुणे येथे स्थलांतर केलेल्या नागरिकांनी आता या आजाराच्या पार्श्वभूमीवर गावाकडे परतायला सुरवात केल्यानंतर संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागांमधून मोठ्या संख्येने नागरिक कामासाठी पुणे व मुंबईला वास्तव्याला होते. गावपातळीवर पुणे व मुंबईहून परत आलेल्या नागरिकांबाबत संशय व्यक्त केला जात आहे. दुसऱ्या बाजूला नागरिकांचा संशय पाहता प्रशासनालाही या बाबीची आता दखल घ्यावी लागणार असल्याचे वास्तव समोर आले आहे...
कामानिमित्त झाले होते स्थलांतरीत
गावातील अनेक गावकरी काही दिवसांपासून कामानिमित्त पुणे, मुंबई, सांगली कोल्हापूर रत्नागिरी सातारा कल्याण ठाणे अहमदाबाद आदी शहरांत गेले होते. मात्र, कोरोना विषाणूच्या भीतीमुळे गावकरी गावाकडे परतत आहेत. मात्र, गावात गावातील इतर ग्रामस्थ संशयाच्या नजरेने पाहत असल्याचे चित्रही पाहावयास मिळत आहे.

