'पासपोर्ट आणि पेटंट्स’ ही आजच्या काळाची गरज -आयपीएस अनंत ताकवले


Pandharpur Live-
स्वेरीतील विद्यार्थ्यांना  केले स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन
पंढरपूर– 'पासपोर्ट आणि पेटंट्स’ ही आजच्या काळाची गरज बनली आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो हा विचार मनात ठेवून विद्यार्थ्यांनी वाटचाल केली पाहिजे. मी लहानपणी ध्येय निश्चित केले आणि त्याचा पाठलाग केला. नियमित अभ्यास आणि योग्य नियोजन यामुळे स्पर्धा परीक्षेत यश मिळाले.आपण घेतलेल्या शिक्षणाचा, ज्ञानाचा उपयोग करून समाजाचे ऋण आपण फेडले पाहिजेत.असे प्रतिपादन पुणे येथील प्रादेशिक पासपोर्ट व आयपीएस अधिकारी अनंत ताकवले यांनी केले.

       गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटला पुणे येथील प्रादेशिक पासपोर्ट व आयपीएस अधिकारी अनंत ताकवले यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी ‘स्वेरी’ संचलित सर्व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मौलिक मार्गदर्शन केले. प्रारंभी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी प्रास्तविक करून पाहुण्यांचे स्वागत केले. दिप प्रज्वलनानंतर आयपीएस अनंत ताकवले यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये कसे यशस्वी व्हावेअभ्यास कसा करावापेपरमध्ये कसे लिखाण करावे याबाबत मार्गदर्शन केले. पुढे ते म्हणाले कीआदरणीय डॉ. रोंगे सरांचे कार्य आणि त्यांनी स्वेरीत केलेली संस्कारांची पेरणी अलौकिक आहे. मला बालपणी चांगले शिक्षक लाभले. वडील ग्रामसेवक होते त्यामुळे मी लहानपणीच ठरविले की भविष्यात काय व्हायचे. सरकारी क्षेत्रात राहून जनतेसाठी, समाजासाठी काहीतरी करावे या विचारांनी मनात घर केले होते त्यामुळे जवाहर विद्यालय शेगाव मधून बारावी पर्यंतचे शिक्षण सीबीएससीतून झाले तर पुढे  कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे मधून अभियांत्रिकी शिक्षण घेतले. मराठी साहित्य आणि भूगोल हे विषय आवडीचे होते त्यामुळे नोकरी करत असतानाच टेक्नोलॉजी डिजीटायझेशनचा अभ्यास केला. सहावी ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम आपण नीटपणे करायला पाहिजे. मी दिल्लीत स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना कोणताही क्लास लावला नाही. जुन्या प्रश्नपत्रिका सोडविणे, पेपर कसा लिहावा ते समजून घेणे तसेच दिलेल्या प्रश्नांचे अर्थ समजून घेतले पाहिजेत. यासाठी लिखाणाचा नियमित सराव आवश्यक आहे. अभ्यासाची बैठक जास्तीत जास्त तासाची असावी.’ असे सांगून त्यांनी स्पर्धा परीक्षेत एकाग्रतेने अभ्यास केला तर परीक्षा फारशी अवघड जाणार नाही.’ असे सांगितले. 

यावेळी अनुलोमचे चीफ रिलेशन ऑफीसर भूपेंद्र मुजुमदार, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल, डी. फार्मसीचे प्राचार्य सतीश मांडवे, अभियांत्रिकीचे सर्व अधिष्ठाता, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. यशपाल खेडकर यांनी सुत्रसंचालन यांनी केले तर डिप्लोमा इंजिनिरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी आभार मानले.