पंढरपूर लाईव्ह
साभार- सा.जोशाबा टाईम्स् मधून...
अशोक बा. माळी
सांगोला. मोबाईल नं. 9423334260
महात्मा फुल्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीन अभिवृध्दीसाठी उपेक्षितांच्या उन्नयनासाठी आणि मानवतेच्या प्रतिष्ठेसाठी जे कार्य केले, जो आदर्श घालुन दिला त्याला खरोखरच जगाच्या इतिहासात तोड नाही. किंबहुना समाज जीवनाच्या सर्वच क्षेत्रात त्यांनी जे कार्य केले त्याचे पहिलेपण जाणवल्याशिवाय रहात नाही. या राज्यातील पहिली मुलींची शाळा त्यांनीच काढलेली. अस्पृश्यांच्या शिक्षणसाठी पहिली शाळा त्यांनीच स्थापन केली. पहिले अनाथालय त्यांनीच आपल्या घरात चालु केले. विधवा स्त्रीयांना आधार देण्याचे कार्य प्रथम त्यांनीच सुरु केले. अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद खुला करुन देणारा पहिला महामानव तोच म्हणावा लागेल. शेतकर्यांची चळवळ उभा करणारा, नाभिकांचा संप घडविणारा, सामाजीक सेवेसाठी संघटना स्थापन करणारा, दुष्काळात पदरमोड करुन गरीबांना अन्न देणारा, विधवांच्या पुर्नविवाहात पढाकार घेणारा, आचार आणि विचार यांचा स्वत:च्या जीवनात मिलाप साधणारा, एका विधवेच्या पोटी जन्मलेल्या ब्राम्हण मुलास स्वत:चा पुत्र मानणारा, धर्म मुल्यावरील काजळी नष्ट करुन एका विश्वधर्माचे स्वप्न साकार करण्यासाठी धडपडणारा हा महाराष्ट्रातील पहिला ध्येयवादी तत्वनिष्ठ आणि त्यागी महापुरुष म्हणून महात्मा फुले यांचा नामोल्लेख करावा. त्यांनी त्या काळी सुखी समाजाची जी स्वप्ने पाहिली ती पुर्णपणे आजही म्हणजे स्वातंत्र्याच्या साठ वर्षातही साकार झाली नाहीत यात त्यांच्या स्वप्नांच्या श्रेष्ठत्वाचे दर्शन घडते.
व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा, सामाजीक समतेचा, न्यायाचा व मानवतेचा त्यांनी जो ध्यास घेतला होता त्यामुळेच आज महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा प्रागतीक स्वरुपाचा झालेला आपणास आढळतो. व्यक्ती, समाज आणि देश यांच्या समन्वयातून उन्नती साधण्याचा प्रयत्न महात्मा फुले यांनी केला. नियती, परिस्थिती आणि वृत्ती यांच्या पलीकडे जाणारे पुर्ण मानवी जीवन त्यांना अभिप्रेत होते. भुतकाळातील दोष लक्षात घेवून, वर्तमानाचा जाच कमी करुन भविष्याची पोषक उभारणी करणारे ते एक क्रांतीकारक होते. काळाचा प्रवाह, विचारांची दिशा आणि कृतीचे मुख यांना अपेक्षीत वळण लावुन सामान्य माणसाला सामान्य गुणाचे आणि कर्तृत्वाचे तेज प्रकट करण्यासाठी त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. त्यामुळेच आज गाडला गेलेला माणुस थोडाफार अंकुरला जात आहे.

आमच्या दृष्टीने महात्मा फुलेंनी सामाजीक सुधारणेच्या अनेक अंगाना स्पर्श केला असला तरी सामाजीक प्रतिष्ठा द्यावयाच्या निकषाचा क्रम त्यांनी आमुलाग्र उलटा केला. ही त्यांनी केलेली फार मोठी कामगिरी म्हणावी लागेल. आमच्या समाजाच्या प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पना सर्व समान्य झाल्या होत्या. आयुष्यभर जो दोन्ही हातांनी कष्टाची कामे करीत नाही उलट इतरांच्या कष्टाच्या जीवावर मजेत जगतो तो प्रतिष्ठीत मानला जातो; परंतू जो एका हाताने जुजबी केले जाणारे कष्टही दिवसाकाठी चार पाच तासाचे ते ही बुध्दीच्या चलाखीत वापर करणारे तरीही यांची प्रतिष्ठा समाजात दांडगी. पण जो माणुस दिवसाकाठी बारा-चौदा तास ढोरासारखे काबाड-कष्ट करतो, दोन्ही हातांनी कष्ट उपसतो, आपल्या बरोबर इतरांच्या पोटा-पाण्याची काळजी घेतो तया माणसाला समाजात काडीमात्र प्रतिष्ठा नसते. श्रमला महत्व देणारे नी त्या आधारे सामाजीक प्रतीष्ठेचा निकष लावून शुद्र अतिशुद्र भुमीहिन यांच्या जीवनाला सामाजीक प्रतीष्ठाप्राप्त स्वरुप देणारे महात्मा फुले हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील थोर नेते म्हणावे लागतील.
या श्रमाला डोळस बनविण्यासाठी त्यांनी शिक्षणाचा आग्रह धरला. शिक्षणाला पुर्णत्व येण्यासाठी विज्ञान आणि शील यांची त्याला जोड दिली. शिक्षण आणि संस्कार यांच्या मिलापातून प्रवाही आणि पोषक अशा सर्वस्पर्शी संस्कृतीला बळ प्राप्त होत असते. या मुल्यावर त्यांची नितांत श्रध्दा होती. अशा प्रवाही संस्कृतीच्या किनार्यावर हजारो वर्षे केवळ तटरक्षकाची सेवाकार्य करणार्या माणसाला त्या प्रवाहाचा भागीदार बनविण्याचे त्यांनी स्वप्न पाहिले. त्यातून सार्या समाजाला एकात्म रुप येण्याच्या प्रक्रीयेला गती प्राप्त झाली. म्हणून एकाच्या अश्रुवर दुसर्याने मोत्याचा मळा पिकविण्याची पारंपारीक कल्पना झुगारुन दिली. आणि प्रत्येकाने आपल्या घामावरच जगायला शिकले पाहिजे, अश्रुंचा उपयोग हा मळ्यासाठी नव्हे तर इतरांच्या दु:खाला भागण्यासाठी झाला पाहिजे. अशी एक विचारसरणी त्यांनी या भुमीत रुजविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
जोतीरावांच्या रुपाने सुरु झालेले हे कार्य प्रथम कुटूंबामध्ये विष्तारले गेले. त्यातून त्याची सामाजीक चळवळ निर्माण झाली आणि त्या चळवळीने आता जणु एका जीवनदायी तत्वज्ञानाचे रुप धारण केले आहे. जगातील सर्व विकसनशील राष्ट्राचा आता जो राष्ट्रीय स्वरुपाचा प्रशासकीय पातळीवरील जाहीरनामा झाला आहे. महात्मा फुले यांच्या विचाराला प्राप्त झालेले हे सार्वजनीक आणि सर्वस्पर्शी रुप पाहिल्यावर त्या विचारातील समान सत्य व अक्षरत्व आपणाला चकीत करुन जाते.
अनेकदा मनात विचार असा येतो की, महात्मा फुले जर झालेच नसते तर या महाराष्ट्राचे चित्र कसे झाले असते? कदाचित हा महाराष्ट्र जीवनाच्या सर्वच क्षेत्रात अतिशय मागासलेला राहीला असता. महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा घेवून त्या नंतरच्या काळात अनेकांनी समर्पित भावनेने समाजकार्य केले. म्हणूनच आज महाराष्ट्र या प्रतीक स्वरुपात आज दिसतो आहे. तरीही त्यांची सारी स्वप्ने पुर्णपणे या भुमीत अद्यापही साकार झालेली नाहीत. त्यांनी पोटतिडकीने सांगितलेले अनेक विचार आपण आजही आमलात आणु शकलो नाही. त्यांची स्वप्ने आणि विचार साकार करण्यासाठी सामाजीक परिवर्तनवादी चळवळी आहेत. त्यांच्यासोबत जावून सर्वांनी आचार-विचारांचे बळ वाढविले पाहिजे..!
11 एप्रिल.. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना भावपुर्ण अभिवादन..!
* * * * * *








0 Comments