पंढरपूर लाईव्ह साभार- जोशाबा टाईम्स्
उमेश जोतिराम सासवडकर
गोकुळ नगर, पंढरपूर.
मोबाईल नं. 96657645688
अज्ञानातच राहणं यातंच बहुजनांचे सुख दडलेले असते, असा चुकीचा समज हा उच्चवर्णियांनी स्वत:च्या विचरांनी निर्माण केलेला होता. पण आज मी ज्यावेळी विचार करायला सुरुवात केली. त्यावेळी प्रथम मी स्वत:चा विचार करु लागलो. मात्र फुले, शाहू आणि आंबेडकर यांनी स्वत:चा विचार कधी केला का ? हा प्रश्न माझ्या विचारात कधी
आला नाही. कारणही अगदी तसेच आहे आणि उत्तरही तसेच आहे. या प्रश्नाचे उत्तर म्हणा अथवा कारण. या व्यक्तींनी आपल्या सबंध आयुष्यात स्वत:चा विचार हा केलेलाच नाही. मात्र त्यांच्या विचारांनी मलाही विचार करायला भाग पाडलेले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यात त्यांच्याबरोबर अनेक हृदयस्पर्षी घटना घडल्या. त्यातील एक महत्वपूर्ण घटना अशी की, त्यांना त्यांच्याच मित्राच्या लग्नातून बाहेर काढण्यात आले.
प्रसंगवर्णन :
हा बघा शुद्राचा कारटा.
ब्राम्हणाच्या लग्नात माळ्याचं कारटं आलंच कसं ?
हा अधर्म आहे.
या कुणबटाला कुणी बोलवलं. त्याला हाकलून द्या.
काय रे ! शरम वाटत नाही तुला ब्राम्हणाच्या लग्नात मिरवायला ?
तु हलक्या जातीचा. तुझ्यामुळे धर्मकार्यात विटाळ होणार....
हे अपमानाचे शब्द कानावर पडताच एका-एकाला कमीत कमी दोन-दोन लावायला फार वेळ लागला नसता फुलेंना. मात्र फुलेंनी तसे न करता ज्वालामुखीच्या तप्त रसाप्रमाणे त्यांच्या मनातील विचार उकळून बाहेर पडले आणि त्याक्षणी ते वदले ... ‘‘मला शिक्षण घेताना अडचणी आल्या. धर्माचा आधार घेवून स्त्रीया, हरिजन आणि खालच्या जातीच्या लोकांना शिक्षणापासून दूर ठेवलं. मी इंग्रजांची नोकरी न करता माझ्या बंधू-भगिनींना शिक्षण देईन. खालच्या जातीचा म्हणून मला हिणवलं, माझा अपमान केला. मी सर्वांना समान वागविण्याचा आग्रह धरीन. जाती-धर्मभेदाच्या भिंतीविरुद्ध संघर्ष करीन!’’पण हाच प्रसंग जर माझ्या बाबतीत घडला तर मी काय करेन, घरी जावून सांगेन नाहीतर मित्रपरिवारात याची चर्चा करुन त्या लग्न समारंभाचे तीन तेरा आणि नऊ अठरा केल्याशिवाय राहणार नाही. मात्र हे सारे फुलेंचे विचार समजून घेण्याआधी नक्कीच घडेल. परंतू ज्यावेळी मी फुले कोण, फुले काय होते? हे प्रश्न ज्यावेळी समजून घेतो, त्यावेळी माझ्यातील इतरांविषयी असणारी क्रोधाची पातळी समाज पोषक विचारात उतरते, हे एक सत्य आहे.
करवीर नगरीचा, बहुजनांचा कर्तबगार राजा म्हणून इतिहासाने ज्या राजाची नोंद घेतली तो राजा म्हणजे लोकराजा राजर्षी शाहू महाराज आहेत. त्यांच्याही आयुष्यात अनेक चढ-उतार आले. त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा प्रसंग असा ....
इ.स. 1899 मध्ये महाराज पूजा करीत असताना पुरोहित नारायण भटजी वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणू लागले. महाराजांनी याचे कारण विचारले असता नारायण भटजी म्हणाले, वेदोक्ताचा अधिकार फक्त ब्राम्हण आणि क्षत्रियांनाच आहे. आपण शुद्र असल्यामुळे वेदोक्त मंत्र म्हणता येणार नाही. या सर्व प्रकारामुळे महाराजांच्या स्वाभिमानाला हादरा बसला. पण हा हादरा बसला खरा पण तो समाजघातक अथवा समाजविघातक ठरला नाही तर हा हादरा शिक्षणशास्त्रात म्हणण्यापेक्षा शिक्षण क्षेत्रात एक नवी क्रांती निर्माण करणारा हा हादरा होता.
1899 ला हादरा बसला आणि पुढे 18 एप्रिल 1901 मध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठी बोर्डिंग ची स्थापना करण्याची आली. त्यानंतर लवकरच दिगंबर जैन बोर्डिंग, वीरशैव लिंगायत वसतिगृह, मुस्लीम बोर्डिंग, श्री नामदेव बोर्डिंग, पांचाल ब्राम्हण वसतिगृह, इंडियन-ख्रिश्चन हॉस्टेल, ढोर-चांभार बोर्डिंग, नाभिक विद्यार्थी वसतिगृह, रावसाहेब सबनीस प्रभू बोर्डिंग अशा कित्येक वसतीगृह आणि बोर्डिंग्ज् सरु केली. केवळ यासाठी ब्राम्हणांनी मला वेड्यात काढण्याचा जो प्रयत्न केला तसा प्रकार माझ्या शुद्र बांधवांशी घडू नये, यासाठी शिक्षण क्षेत्रात यशस्वीपणे पार पाडलेली ही क्रांती होती.
आज मात्र माझ्याकडे सगळं काही असताना मी हे करु शकत नाही. कारण शाहू महाराजांचे विचार सोबत घेवून आचरण करणारे लोक नाहीत. ही माझी खंत आहे.
1905 दरम्यान तो काळ मुंबईतील एल्फिस्टन हायस्कूल मधील तो प्रसंग. ज्या प्रसंगामुळे डॉ. आंबेडकरांनी दलित म्हणून दलितांचे दैवत बनले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक गणित सोडवायला सांगितले होते. कुणालाही ते सोडवायला जमले नाही. फक्त भीमानं ते बरोबर सोडवलं होतं. गुरुजी भीमाला म्हणाले, ‘‘ते गणित फळ्यावर सोडवून दाखव.’’ त्याचबरोबर इतर मुले ओरडली, ‘‘गुरुजी जरा त्याला थांबवा’’ आणि ती मुले फळ्याकडे धावली. का रे ? गुरुजींनी विचारले. आमचे डबे फळ्यामागे आहेत. मग? त्याचा स्पर्श फळ्याला झाला तर आमचे डबे विटाळतील. पुढे मुलांनी आपले डबे काढू घेतले. भीमा फळ्याजवळ गेला व त्याने गणित सोडविले. गुरुजींनी त्याचे अभिनंदन केले. पण मुले मात्र शांत होती. भीमाचे मन दुखावणे साहजिकच होते. त्यांचा अभ्यास चांगला होता. इतरांपेक्षा त्यांना चांगले गुण होते. पण ते खालच्या जातीत जन्मले म्हणून हे
याचठिकाणी मी असलो असतो तर प्रथम गुरुजींना म्हणलो असतो, तुम्ही या बाहेर मग बघतो तुम्हाला आणि आता राहिला प्रश्न त्या विद्यार्थ्यांचा. त्यातील एकाएकाला गाठून मारले असते. हा आजचा माझा विचार समाज विघातक आहे. हे मला कधी कळेल. ज्यावेळी मी डॉ. आंबेडकर समजून घेऊ लागेन तेंव्हा मला हे निश्चित कळेल.
वरील सबंध लेखणीत मी हा शब्दप्रयोग फक्त एवढ्यासाठी केलेला आहे की, आजा आपला सबंध समाज मी माझ्यात पाहण्याचा प्रयत्न करतो. यातील मी हा तुम्ही आणि आपण सर्वजण आहोत. हेच या लेखणीतून आपणाला सांगण्याचा हेतू आहे. आजही आपण फुले, शाहू आणि आंबेडकर यांची जयंती साजरी करतो. ती फक्त एवढ्यासाठीच की मला समाजात प्रतिष्ठा मिळवायची आहे म्हणूनच. मात्र प्रथम फुले, शाहू आणि आंबेडकर हे अभ्यासा. मग आपणाला समाजात प्रतिष्ठाच काय पण सामजाचा धुरा सांभाळणारा योद्धा म्हणून आपली ओळख निश्चितच होईल !





0 Comments