वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून दोघा भावांचा मृत्यू

वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून दोघा भावांचा मृत्यू
18 Jul. 2017


राहुरी तालुक्‍यातील डिग्रस येथील घटना : मुळा नदीपात्रात वाळूउपसा करताना घडला प्रकार
राहुरी विद्यापीठ - राहुरी तालुक्‍यातील डिग्रस येथे मुळा नदीपात्रात वाळूउपसा करणाऱ्या दोन सख्ख्या भावांचा वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.ज्ञानदेव जालिंदर जाधव (वय 35), मच्छिंद्र जालिंदर जाधव (वय 29, दोघे रा. बारागाव नांदूर, बावनखोल्या परिसर, ता. राहुरी) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर असे की, राहुरी तालुक्‍यातील डिग्रस केटीवेअर येथे मुळा नदीपात्रातून वाळूउपसा सुरू आहे. सोमवारी दुपारी चारच्या दरम्यान काही मजूर नदीपात्रात वाळू भरत होते. त्यामध्ये बारागाव नांदूर येथील बावनखोल्या परिसरात राहणारे ज्ञानदेव जालिंदर जाधव व मच्छिंद्र जालिंदर जाधव दोघे सख्खे भाऊ कपारीतून वाळू काढत होते.
त्याचवेळी वाळूचा मोठा ढिगारा कोसळला. त्या ढिगाऱ्याखाली दोघे दबले गेले. तेथील इतर मजुरांनी जाधव बंधूंना ढिगाऱ्याखालून काढून राहुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी वर्षा डोईफोडे यांनी त्यांना मृत घोषित केले. यावेळी आणखीही काही मजूर ढिगाऱ्याखाली दबले होते. परंतु, इतर मजुरांनी त्यांना त्वरित बाहेर काढल्याने त्यांचा जीव वाचल्याची परिसरात चर्चा सुरू होती.
गेल्या अनेक वर्षांपासून राहुरी तालुक्‍यातील राहुरी खुर्द, डिग्रस केटीवेअर, बारागाव नांदूर, देसवंडी, दवणगाव, तांदुळवाडी, आदी भागात दिवसाढवळ्या वाळूउपसा सुरू आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


  






























































Post a Comment

0 Comments