स्वेरीत ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’वर कार्यशाळा संपन्न
पंढरपूर- ‘सुखाचा शोध घेत असताना आज माणूस नकळत अधिक दुखी होत आहे. त्याचे कारण म्हणजे अनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी वेळ व ताकत नाहक खर्च करत आहे. यामुळे त्याच्या गरजा नकळत वाढत आहेत आणि गरजा पूर्ण करण्यासाठी माणूस मृगजळाच्या मागे धावून दमछाक होत आहे. याच कारणाने स्वतःला श्रीमंत माणूस म्हणून घेणारा माणूस आज सर्वाधिक दुखी दिसत आहे तर गरीब माणूस अधिक सुखाचा स्वर्गीय आनंद उपभोगत असल्याचे चित्र दिसत आहे .’ असे प्रतिपादन ‘द रियल सक्सेस’चे संचालक डॉ. भरत चौगुले यांनी केले.
गोपाळपूर (ता, पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनीअरींगमध्ये स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदान करणाऱ्या प्राध्यापकांसाठी दि.२९ एप्रिल ते ४ मे २०१९ पर्यंत ‘रोल मॉडेल टीचर्स अॅण्ड क्लासरूम लीडरशिप मॅनेजमेंट’ या विषयावर तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दि. ६ मे ते ११ मे २०१९ पर्यंत ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’ या विषयावर असे दोन्ही मिळून स्वेरीत दोन स्वतंत्र कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यात मुख्य संवादतज्ञ म्हणून डॉ. भरत चौगुले मार्गदर्शन करत होते. प्रारंभी समन्वय एम. बी.ए.च्या प्रा. एम.एम. भोरे यांनी दोन्ही कार्यशाळेविषयी माहिती देवून याचे आयोजन का करावे लागले? याविषयी सविस्तर माहिती दिली. पुढे बोलताना संचालक डॉ. चौगुले म्हणाले की, ‘प्रत्येकामध्ये अनेक कला अवगत असतात परंतु स्टेज डेअरिंग नसते आणि त्यात आत्मविश्वासाचा अभाव या दुहेरी कारणांमुळे आपले उच्च विचार कुजून जातात. जे भविष्यात फायद्याचे असतात. त्याला वेळीच व्यक्त करणे गरजेचे आहे.’ असे सांगून ‘ज्यावेळी कामाचा ताण वाढतो, त्यावेळी नेमके काय करावे? हे सविस्तर प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले. तसेच ताणतणाव कमी करण्याचे उपाय सांगितले. व्यायाम, नियमित आहार, वजन वाढू नये यासाठी नियम आदी महत्वाच्या बाबींवर देखील सखोल मार्गदर्शन केले.

माणूस दुखी होण्याची कारणे आणि यासाठी काय करावे लागणार? यासंदर्भात मार्गदर्शन करणाऱ्या महत्वाच्या प्रेरणादायी व्हिडीओ क्लिप्स दाखवून स्पष्ठ केले. सतत उत्साही राहण्यासाठी नियमितच्या कामात बदल करावे, आहारात कडधान्ये, पालेभाज्या, आम्लयुक्त पदार्थ, प्रथिने याचे प्रमाण कसे असावे ? हे सांगितले. मोबाईलचा अतिवापर कसा टाळावा. यासाठी व सतत आनंदी राहण्यासाठी महत्वाच्या टिप्स दिल्या. या कार्यशाळेमुळे प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारि अधिक उत्साही दिसत आहेत. डॉ. चौगुले यांच्या मार्गदर्शनानंतर ऑफिसचे वरिष्ठ लिपिक मिलिंद कोकणे म्हणाले की, ‘जीवन जगताना आनंद कसा घ्यायचा? हे डॉ चौगुले यांनी सुंदर पटवून सांगितले. कनिष्ठ लिपिक प्रियांका नागरस म्हणाल्या की, ‘डॉ. चौगुले यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्वतःला ओळखून सकारात्मक विचार केल्यास तणाव येणार नाही असे सांगितले.’ स्टोअरचे प्रमुख सुहास तगारे म्हणाले की, ‘योग्य मार्गदर्शनातून डॉ. चौगुले यांनी आहारावर नियंत्रण ठेवण्यास सांगितल्यामुळे मानसिक व शारीरिक आजार कोसो दूर राहतात हे सांगितल्यामुळे आमच्यातील ताण कमी होण्यास मदत मिळाली.’ प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या डॉ. एम. एम.अवताडे म्हणाल्या की, ‘अवास्तव चर्चा केल्याने ताकत खर्ची पडते यासाठी योग्य ठिकाणी विचार प्रकट करावे तसेच आपण स्वतः माणूस आहे त्यानंतर पद आहे. त्यामुळे प्रथम माणूस बनावे हे डॉ. चौगुले सरांचे विचार आवडले.’ असे अनेकांनी या कार्यशाळेवर प्रतिक्रिया दिल्या. एकूणच समाजामध्ये माणूस हाच स्वतः तणावाचे कारण बनत आहे. त्यासाठी ‘तणाव कमी करण्यासाठी प्रथम आपले ध्येय एकच ठेवा, त्यानुसार वाटचाल करावे असे अनेक उदाहरणाद्वारे डॉ. चौगुले यांनी पटवून दिले. जर तुम्ही अनावश्यक गरजा पूर्ण करण्याच्या मागे लागले असाल तर ते आताच थांबवा अन्यथा एक वेळ अशी येईल की इच्छा नसतानाही गरजेच्या वस्तू विकाव्या लागणार. म्हणून मर्यादा ह्या गरजेपुरतेच असू द्या. तसेच कुटुंबातील सदस्यांकडे अधिक लक्ष द्या, त्यांच्याबरोबर काही वेळ घालविल्यास संपूर्ण कुठुंब आनंदी होते. यासाठी स्वतःच्या मानसिकतेत बदल करण्याची नितांत गरज आहे.’ असे अनेक प्रेरणादायी विचार मांडले. या कार्यशाळेचा लाभ स्वेरीमधील प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतला.




0 Comments