ही निवडणूक जनतेची निवडणूक होती. भाजपचा हा प्रचंड विजय हा जनता जनार्दनाचा विजय आहे, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. भाजपच्या प्रचंड विजयानंतर पक्षाच्या मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांशी ते बोलत होते. भाजपाध्यक्ष अमित शहा यावेळी उपस्थित होते.
भाजपच्या विजयानंतर संध्याकाळी भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यांना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आदी उपस्थित होते.
मोदी यांनी निवडून आलेल्या सर्वच पक्षांच्या उमेदवारांचे अभिनंदन केले. लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका आणि पोटनिवडणुकीत जिंकलेल्या उमेदवारांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या. निवडून आलेल्या सर्वच उमेदवारांनी देशाच्या विकासासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी केले.
आपल्या भाषणात त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीचा उल्लेख केला. भाजपचा कार्यकर्ता निरंतर कार्यरत असतो. तो थकत नाही आणि हार मानत नाही. आम्ही दोन होतो तेव्हा खचलो नाही आणि आता दुसऱ्यांदा निवडून आलो, तरी आमच्या आदर्शांना विसरणार नाही, असे त्यांनी सांगितले. आपल्या भाषणात त्यांनी ‘सेक्युलर’वाद्यांची चांगलीच हजेरी घेतली.





0 Comments