। पंढरपूर, प्रतिनिधी।
विश्वासापेक्षा संशय, मैत्रीपेक्षा वैर, प्रेमापेक्षा द्वेष तसेच जाती जातीमध्ये,धर्माधर्मामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. द्वेष वाढत असताना तो दूर करण्याची जबाबदारी पत्रकारांसह सामान्य नागरिकांची जबाबदारी आहे. तसे झाले तरच माणूस हा माणूस म्हणून जगू शकेल, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक डॉ. आ.ह. साळुंखे यांनी केले.
डॉ. आ.ह. साळुंखे यांचा 75 व्या जन्मवर्षपूर्ती निमित्त श्रमिक पत्रकार संघांच्या वतीने येथील पत्रकार भवन येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचाही सत्कार करण्यात आला. डॉ. साळुंखे म्हणाले, संत नामदेवांच्यापासून ते संत गाडगेबाबा, साने गुरूजी यांच्यापर्यंत सर्वांनी लोकांना जोडण्याचे काम केले. आजच्या परिस्थिती फार विचित्र झालेली आहे. वारकरी संप्रदायाला मोठा वारसा आहे. संत तुकाराम अंधश्रध्दा, कर्मकांड याला विरोध केला. प्रचंड विषमता देशात निर्माण झालेली आहे. ती पुढच्या 15 वर्षात घात केल्याशिवाय राहणार आहे. मुलांच्या चेहर्याकडे बघत असताना त्याला काय सल्ला द्यावा, कसे सांत्वन करावे हे आज आम्हाला समजत नसल्याचे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक डॉ. आ.ह. साळुंखे यांनी केले.
आ. भारत भालके म्हणाले, डॉ. आ. ह. साळुंखे यांनी आपल्या लेखनातून जीवनातील वास्तवाची जाणीव होते. आज जेष्ठ नागरिकांना महिन्याला 600 रूपये मिळविण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. शेतकरी विविध अडचणींना तोंड देत आहे. त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. विचारवंत सुभाष वारे म्हणाले, प्रत्येकाला आपले जीवन आनंदात जगण्याचा अधिकार आहे. आजचा सत्कार हा डॉ. साळुंखे यांच्या विचाराचा सत्कार आहे. कर्मविपाकाच्या सिध्दांताला नाकारण्याची गरज आहे. आपली परिस्थिती बदलण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. जन्माला आलो ते सत्य आहे, एक दिवस मृत्यू येणार आहे हे वास्तव आहे. हे प्रत्येकाने समजून घेत पुढे जाण्याची गरज आहे. आपला मेंदू हा विचार करण्यासाठी दिला असून, प्रत्येक बाबतीत चिकीत्सा करणे महत्वाचे असल्याचे वारे म्हणाले. यावेळी चित्रकार सचिन खरात यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी केले. आभार नवनाथ पोरे यांनी मानले तर सुत्रसंचलन सुधाकर कवडे यांनी केले. यावेळी स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, मोहन अनपट, किरण घाडगे, दत्ता बागल, गणेश बागल, डॉ. राहुल घुले, भास्कर बंगाळे, ड. विनायक सरवळे, सत्यम धुमाळ आदी उपस्थित होते.
मध्यमवर्गीयांनी पाठीमागे वळून पहावेसकारात्मक, शत्रूला समजून घेणारा विचार जो स्विकारतो तो आमचा. कमी त्रासात आधिक मिळावे ही वृत्ती वाईट असून, मध्यम वर्गाने पाठीमागे वळून पाहिले पाहिजे. पुढच्या दहा वर्षात पाण्याची समस्या अधिक गंभीर होणार.
- प्रा. सुभाष वारे, जेष्ठ विचारवंत





0 Comments