पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोघेही खुनी असल्याचा सणसणीत व गंभीर आरोप मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केला आहे. एवढंच नव्हे तर तसे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा सुध्दा त्यांनी केलाय.
ते बीडमध्ये आयोजित संविधान बचाव सभेत बोलत होते. या सभेला हजारो नागरिक उपस्थित होते. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड याही यावेळी उपस्थित होत्या.
नि. न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील म्हणाले, 'नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे खुनी आहेत. ते खुनी असल्याचे माझ्याकडे पुरावे देखील आहेत. अमित शाह तडीपार गुंड आहेत. मोदी-शाह यांच्यावर 'मास मर्डर'चा गुन्हा आहे.
'धर्मनिरपेक्ष असाल तर दलित किंवा मुस्लीम व्यक्तीला सरसंघचालक करा'
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि मोदी-शाह या गुंडांना हरवायचं आहे. देशातील सर्व मुस्लीम एका रक्त-मांसाचे आहेत. आरएसएस जर धर्मनिरपेक्ष असेल तर त्यांनी दलित किंवा मुस्लीम समाजाच्या व्यक्तीला सरसंघचालक करावं. त्यांनी असं केलं नाही तर ते ढोंगी आहेत असं सिद्ध होईल, असंही नि. न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील म्हणाले.
मी दलित आणि मुस्लिमांनी एकत्र यावं हे मागील 30 वर्षांपासून सांगत होतो. आज तसं होताना दिसत आहे. याच दिवसाची मागील 50 वर्षांपासून मी वाट पाहात होतो. ही मोदींचीच मेहरबानी आहे.
'सध्याच्या गृहमंत्र्यांनी लक्ष्य द्यावं, अन्यथा त्यांच्याविरुद्धही आंदोलन'
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक केस दाखल आहेत. सध्या न्यायव्यवस्था देखील दडपणात आहे. न्यायमूर्ती लोया प्रकरणात फडणवीस यांच्यावरही आरोप आहेत. याबाबत माझ्याकडे पुरावे आहेत. सध्याच्या गृहमंत्र्यांनी यात लक्ष्य घालावं, अन्यथा मला या गृहमंत्र्यांविरुद्ध देखील आंदोलन करावं लागेल, असा इशारा नि. न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी दिला.
नि. न्यायमूर्ती कोळसे पाटील म्हणाले, 'आरएसएसचे सरसंघचालक गोळवकरांनी त्यांच्या पुस्तकात लोकशाही नको असं लिहिल्याचे उल्लेख आहेत. भाजप आणि आरएसएस हिंदूंचे शत्रू आहेत. मोदी-शाह जन्मल्यापासून कधीच सत्य बोलले नाही. असं नसेल तर मी भाषण करणं बंद करेन.'


0 Comments