Pandharpur Live- :- प्रत्येक मराठी भाषिक व्यक्तींनी आपापल्या दररोजच्या दिनचर्येत मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आणि महत्वाचे आहे असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स होल्डर विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते मोडनिंब येथील मारुतीराव हरीराव महाडीक कला व वाणिज्य महाविद्यालयात मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थी व विद्यार्थीनींना मार्गदर्शन करताना बोलत होते.
वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण सुश्राव्य अशा कवितांचे गायन करुन पुढे बोलताना कवी रवि सोनार म्हणाले की - मराठी भाषेत दर्जेदार शब्दांचा अफाट खजिना असून आपण बोलण्यात व लिहिण्यात अगदी सहजपणे मराठी भाषेचा उपयोग करू शकतो. शिवाय मराठी ही आपली मातृभाषा असल्याने मराठी भाषेतील प्रत्येक गोष्ट आपल्याला सहजपणे लक्षात घेता येते.
मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दादासाहेब शिंदे होते. प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख प्रा. डॉ. वामन जाधव यांनी करुन दिली. या कार्यक्रमास प्रा. डॉ. पी. बी. भांगे, प्रा. एच. पी. पाटील, प्रा. डी. के. देशमुख, प्रा. डॉ. सौदागर साळुंखे व प्रा विश्वास ताकतोडे आदी उपस्थित होते. यावेळी कवी रवि सोनार यांच्या हस्ते स्वप्निल कसबे, आकाश साळुंखे, औदुंबर मांजरे व कु. खतिजा तांबोळी या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. एस. टी. पाटील यांनी सुत्रसंचलन व आभार व्यक्त केले.


0 Comments