‘कोरोना’ विषाणु पार्श्‍वभुमीवर श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरात केल्या ‘या’ उपाययोजना

Pandharpur Live Online-
सध्या जगभरात कोरोना या विषाणुने थैमान घातले असुन भारतातही कोरोना सदृश्य आजाराचे कांही रुग्ण आढळुन आले आहेत. महाराष्ट्राला मात्र ‘कोरोना’ चा कसलाच धोका नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. परंतु यासंदर्भात योग्य ती काळजी व उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. पंढरीतील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व परिसरातही कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीने दक्षतेचा उपाय म्हणून दिवसातून सहा ते सात वेळा मंदिरात साफसफाई सुरू केली आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी देशातून आणि परदेशातून देखील भाविक येत असतात. या भक्तांच्या माध्यमातून कोरोना विषाणूंचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दिवसभरात सहा ते सात वेळा मंदिरात स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिरातील कर्मचार्‍यांसाठी मास्क मागविण्यात आले आहेत. अशी माहिती श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव आपल्याकडे झालेला नसला तरी केवळ दक्षता म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. मंदिरात सर्वत्र स्वच्छता केली जात आहे. कोरोना ची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय या संदर्भामध्ये लोकांना माहिती व्हावी यासाठी फलक लावण्यात येत आहेत.