रश्मी ठाकरे बनल्या 'सामना' च्या संपादक


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर संपादक पदी राहण्यात अडचणी येऊ शकतात. अशी शक्यता असल्याने आजपासून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे संपादक पद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. सामनाच्या प्रेसलाईन मध्ये संपादक म्हणून सौ. ठाकरे यांचे नाव आजपासून लावण्यात आले आहे.

२३ जानेवारी १९८९ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामना हे मुखपत्र सुरु केले. त्यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. सामना वृत्तपत्र सुरु झाल्यापासून रश्मी ठाकरे या तिसऱ्या संपादक बनल्या आहेत.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे सामनाच्या कार्यकारी संपादकपदी कायम आहेत.

राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे आता पक्षाच्या मुखपत्राचे संपादक म्हणून राहणे त्यांना अडचणीचे ठरु शकते, हे लक्षात घेऊन, संपादक पदात बदल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments