फक्त 50 जणांसह संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे होणार प्रस्थान


Pandharpur Live Online- ll
पुणे | पुण्यातून तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखींच्या प्रस्थानास परवानगी मिळाली आहे. जिल्हा प्रशासनाने 50 वारकऱ्यांसह पालखी प्रस्थानास परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी ही माहिती दिली. 

तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा 12 जूनला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान 13 जूनला होणार आहे.

कोरोनाचा संसर्ग लक्षात घेत प्रशासनाने पालखी प्रस्थानावर काही निर्बंध घातले आहेत. यानुसार संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला केवळ 50 लोकांच्या उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे.

देहू आणि आळंदी या तीर्थक्षेत्रांचा प्रतिबंधित क्षेत्रात समावेश नाही.


Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
कोरोनाचे संकट पाहता राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. केंद्र सरकारने धार्मिक स्थळे सुरू करण्याची मुभा दिली आहे. वारीची परंपरा अखंडित राहण्यासाठी 50 जणांसह पालखी प्रस्थानास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार गुरुवारी 12 जून रोजी देहू येथून संत तुकाराम महाराजांची पालखी आळंदी येथून निघणार आहे. तसेच दुसर्‍या दिवशी 13 जून रोजी आळंदी येथून संत ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपुरला रवानगी होणार आहे. 

या पालखी सोहळ्यात प्रत्येकी 50 वारकरी उपस्थित राहतील, देहू आणि आळंदी हे दोन्ही क्षेत्र कन्टेनमेंट झोन मध्ये नसल्याने ही परवानगी देण्यात आली आहे. उपस्थित सर्व वारकर्‍यांनी मास्क वापरणे, स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण नियमाचे पालन करावे अशा सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी दिलेल्या सूचना व आदेशानुसार सामाजिक अंतर राखून तसेच पालखी सोहळा प्रस्थानासाठी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आलेल्या सर्व नागरिकांनी मास्क वापरणे आवश्‍यक आहे. मंदिर परिसरात स्वच्छता व निर्जंतुकीकरण आदी नियमांचे पालन करून या दोन्ही पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी मंदिर परिसराच्या आतमध्ये परवानगी देण्यात आलेली आहे.

राज्यात दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यंदाचा पायी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी यंदा श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पादुका हवाई मार्गे अथवा रस्ते मार्गे पंढरपूरला नेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. दशमीच्या दिवशी या दोन्ही पालख्या पंढरपुर येथे पोहचणार आहे. पालख्या हवाई मार्गे की रस्ते मार्ग पंढरपूर येथे नेण्याचा निर्णय हवामानाचा अंदाज घेऊन घेण्यात येणार आहे.

करोना रोखण्यासाठी प्रशासनाने केलेली उपाययोजना वारकऱ्यांनी मान्य केली असली तरी दर्शनाची आस मात्र अस्वस्थ करीत आहे.

Post a Comment

0 Comments