कर्जबाजारीपणामुळे सोलापूरातील एकु कुटूंब उध्दवस्त... कर्जाच्या तणावाखालील शिक्षकाकडून पत्नीची हत्या

सर्वसामान्यांसह विविध क्षेत्रातील मातब्बर मंडळींना सुध्दा सध्या मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सर्वसामान्य माणुस तर पुरता कोलमडून गेलाय. आर्थिक संकटामुळे हतबल झाल्यामुळे एखादं कुटूंब कसं उध्दवस्त होऊ शकतं आणि प्रेमानं मांडलेल्या संसाराची क्षणात कशी धुळधाण होते याची जुळे सोलापूरमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे आली. जुळे सोलापूर येथील चंदननगरमधील विकास हरवाळकर या शिक्षकाने पहाटे आपल्या पत्नीचा डोक्यात वरवंटा घालून तिचा खून केला. या खुनानंतर तणावाखाली असलेल्या विकासनेसुध्दा गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विकास यांची प्रकृती गंभीर आहे. कर्जबाजारी झाल्यामुळे हतबल झालेल्या विकासने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळतेय.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार विकास आणि अर्चना या दोघांनी काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. या दोघांना 6 वर्षांचा मुलगा आहे.  कर्जबाजारीपणामुळे एक हसता खेळता परिवार उध्दवस्त झाल्याने सोलापूरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

विकास (37) आणि अर्चना (35) याचा काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. दोघांचाही सुखी संसार सुरू होता. नोकरी सांभाळून जादा पैसे मिळावेत यासाठीचा मार्ग म्हणून विकासने शेअर बाजारात पैसै गुंतवले होते. यात त्यांना जवळपास 2 कोटी 80 लाखाचे नुकसान झाले होते. या कर्जावरूनच पती-पत्नीत  सतत वाद होत होते. पहाटे दोघांत पुन्हा वाद झाला, यातून विकासने बायकोच्या डोक्यात वरवंटा घातला. आणि रक्तबंबाळ बायकोला पाहून तणावाखाली विकासनेही गळपास लावून घेतला.

दरम्यान, अज्ञात व्यक्तीने विजापूर पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अगदी 5 मिनिटांत पोलिस घटनास्थळी आल्याने पोलिसांना विकासला वाचवता आले.

Post a Comment

0 Comments