
Pandharpur Live Online:
वारंवार आवाहन व विनंती करून देखील भरणा होत नसल्याने पश्चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक वर्गवारीतील ग्राहक व कृषिपंपाच्या वीजबिलांची थकीत रक्कम तब्बल ८ हजार ५०४ कोटी ८६ लाखांवर गेली आहे. वाढत्या थकबाकीमुळे आर्थिक घडी विस्कटल्याने व अन्य कोणताही पर्याय नसल्याने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेला वेग देण्यात आला आहे.
सद्यस्थिती पश्चिम महाराष्ट्रातील २४ लाख ८ हजार २०९ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे १०२३ कोटी ३२ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर ७ लाख ३९ हजार ९०९ कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे ७ हजार ४८१ कोटी ५४ लाख रुपयांची थकबाकी आहे.
महसुलासाठी अन्य कोणताही मुख्य स्त्रोत उपलब्ध नसल्याने प्रामुख्याने वीजबिलांच्या दरमहा वसुलीवरच महावितरणची आर्थिक मदार आहे. मात्र वीजबिलांच्या थकबाकीचा डोंगर वाढत असल्याने सद्यस्थितीत वीजखरेदी, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च, कर्जांचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापनांचा खर्च भागविण्यासाठी महावितरणची तारेवरची कसरत सुरु आहे. त्यामुळे नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याचा कटू कारवाई सुरु करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विजेची वाढती मागणी २० हजार ते २१ हजार ५०० मेगावॅटवर स्थिरावली आहे. परंतु आर्थिक संकटात असताना देखील महावितरणकडून विजेच्या मागणीप्रमाणे वीजपुरवठा करण्यात येत आहे, हे उल्लेखनीय.
सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये पुणे जिल्ह्यात ११ लाख ३ हजार ३१५ ग्राहकांकडे ५४२ कोटी ८२ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर सातारा जिल्ह्यात २ लाख २७ हजार ४८४ ग्राहकांकडे ५२ कोटी १९ लाख, सोलापूर जिल्ह्यात ३ लाख ३७ हजार ५६३ ग्राहकांकडे १३२ कोटी ५२ लाख, कोल्हापूर जिल्ह्यात ४ लाख ३८ हजार ९८२ ग्राहकांकडे १८७ कोटी ७९ लाख आणि सांगली जिल्ह्यात ३ लाख ८६५ ग्राहकांकडे १०७ कोटी ९२ लाख रुपयांची थकबाकी आहे.
यासोबतच कृषिपंप वीज धोरणामधून पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील १२ लाख ४४ हजार ६८७ कृषिपंपधारक शेतकऱ्यांना थकबाकीमध्ये एकूण २६४३ कोटी रुपयांची महावितरणकडून निर्लेखनद्वारे तसेच विलंब आकार, व्याजातून सूट देण्यात आली आहे. या शेतकऱ्यांकडे आता सुधारित ८ हजार १७५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यातील ५० टक्के थकबाकी येत्या मार्च २०२२ पर्यंत चालू वीजबिलासह भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकी देखील माफ होणार आहे. आतापर्यंत ५ लाख ४ हजार ७७८ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. चालू वीजबिलासह या शेतकऱ्यांनी ६८७ कोटी ८२ लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे. यामध्ये त्यांना भरलेल्या थकबाकीएवढी म्हणजे ३४६ कोटी ७३ लाख रुपयांची अतिरिक्त सूट मिळाली आहे.
या कृषी वीज धोरणाचा लाभ घेत पश्चिम महाराष्ट्रातील १ लाख ६७ हजार १२६ शेतकऱ्यांनी चालू वीजबिलाचे ८० कोटी ८० लाख आणि सुधारित थकबाकीचे २५० कोटी २९ लाख रुपयांचा भरणा करीत वीजबिलातून थकबाकीमुक्ती मिळविली आहे. या सर्व थकबाकीमुक्त झालेल्या शेतकऱ्यांचे त्यांनी भरलेल्या थकबाकीएवढेच म्हणजे २५० कोटी २९ लाख रुपयांची रक्कम देखील माफ झाली आहे.
0 Comments