पंढरपूर : १९७०-७१ सालापासून खंडित झालेली पंढरपूर तालुक्यातील देगाव व पंढरपूर तालुक्यातील अनेकांचे ग्रामदैवत व कुलदैवत असलेल्या श्री संध्यावळी देवीची पालखी मिरवणूक परंपरा यंदा ५३ वर्षांनंतर प्रथमच पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
देगावचे सरपंच संजय घाडगे यांनी गेल्या ५३ वर्षांपासून खंडित झालेली मानाची पालखी मिरवणूक सुरू करावी, असा प्रस्ताव श्री संध्यावळी देवी ट्रस्ट गावकऱ्यांसमोर मांडला होता. पालखी मिरवणुकीच्या मांडलेल्या प्रस्तावाला संध्यावळी देवी ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रतापराव सुखदेव पाटील तसेच ट्रस्टचे संचालक वसंत घाडगे, संचालक सर्जेराव घाडगे, संचालक विश्वास श्रीधर पाटील, औदुंबर प्रताप पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी तात्काळ होकार देऊन सदर पालखीची परंपरा चालू करण्यात होकार दिल्याने सदर पालखीचा मार्ग मोकळा झाला आहे.
पंढरपूरपासून अवघ्या ५ किमी अंतरावर असणाऱ्या देगांव गावात श्री संध्यावळी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. संध्यावळीला पंढरपूरचे प्रवेशद्वार मानले जाते. मंदिराच्या तीन बाजुंनी पाणी असल्याने अतिशय सुंदर तीर्थक्षेत्र बेट म्हणून संपूर्ण तालुकाभरात प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही पालखीची परंपरा चालू होती. मात्र, १९७० साली झालेल्या वादामुळे ही पद्धत बंद झाली होती. मात्र, सरपंचांच्या पुढाकाराने ही परंपरा पुन्हा चालु होणार असल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सदर पालखी देगांव गावातून संध्यावळी मंदिर,ते महादेव मंदिर, खंडोबा मंदीर, पिरसाहेब मंदीर मारुती मंदिर ते पुन्हा संध्यावळी मंदिर असा गाव वेढा पूर्ण करून पालखी मंदिरात ठेवण्यात आली.



0 Comments