दुचाकी थांबवून तरुणाच्या डोक्यात सपासप वार

 

काम संपल्यानंतर दुचाकीवर घरी जात असलेल्या गारवा बिर्याणीच्या मॅनेजरची अज्ञातांनी हत्या केली आहे. डोक्यात वार करुन त्यांचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.


घटना शनिवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला नसून हल्लेखोरांचा नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झाला नाही.  भरत भगवान कदम (वय २४, रा. धायरेश्वर प्राईड, मतेनगर, धायरी, पुणे) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.


याप्रकरणी त्यांचा भाऊ प्रकाश भगवान कदम यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत कदम हे गारवा बिर्याणी येथे मॅनेजर म्हणून काम करत होते. शनिवारी रात्री काम संपल्यानंतर ते दुचाकीवरुन घरी जात होते. यावेळी धायरेश्वर मंदीर ते पारे कंपनी चौक रस्त्यावरील निर्मिती असोसिएटस बिल्डिंगच्या समोरील गायकवाड यांच्या रिकाम्या प्लॉटजवळ हल्लेखोरांनी भरत कदम यांना अडविले.


यानंतर कोणत्यातरी हत्याराने त्यांच्या डोक्यात वार केले. हल्ल्यानंतर ते जखमी अवस्थेत तिथेच पडले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले.याची माहिती धायरी मार्शल यांना मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मिळाली.

सिंहगड रस्ता पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा भरत कदम यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. त्यांच्याजवळ त्यांची दुचाकी आढळून आली. तसेच त्यांच्या खिशातील पैसे, पाकीट आणि अन्य साहित्यही तसंच होतं.


त्यामुळे चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भरत कदम यांच्या खुनामागील नेमके कारण काय? याचा शोध पोलीस घेत आहेत. सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार आणि सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या आहेत. तसंच आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना झाली आहेत.


Post a Comment

0 Comments