केरळमध्ये नरबळीचं प्रकरण समोर आलं आहे.
नरबळीसाठी दोन महिलांची हत्या केल्याच्या आरोपांप्रकरणी केरळमध्ये तीन लोकांना अटक करण्यात आली आहे.
या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेचा तपास सुरू आहे.
केरळमधल्या या भीषण प्रकाराने देशभरात खळबळ उडाली. पुरोगामी राज्य म्हणून ओळख असलेल्या केरळमध्ये अशी घटना समोर आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
आरोपींपैकी एकाचं नाव भागवल सिंग असं असून, ते आयुर्वेदिक उपचार करतात. त्यांच्या पत्नीचं नाव लैला आहे. तिसऱ्या आरोपीचं नाव मोहम्मद शाफी असून तो मांत्रिक आहे.
बुधवारी न्यायालयाने या तिघांची तीन आठवड्यासाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केलीय.
कोची पोलीस कमिशनर सी. एच. नागाराजू यांनी सांगितलं की, "दोन हत्या चार महिन्यांच्या कालावधीत झाल्या आहेत. आर्थिक फायद्यासाठी अघोरी प्रथेचा भाग म्हणून या महिलांची हत्या करण्यात आली."
महिलांच्या हत्येमागचं कारण मानवी बळी देणं असल्याचं प्राथमिक उद्दिष्ट आहे. आरोपींनी दिलेल्या कबुलीनंतर तपास सुरू आहे.
भारतातल्या काही ठिकाणी अजूनही काळ्या जादूचा अंमल आहे. काही प्रथांचं पालन केलं तर आर्थिक प्रगती होऊ शकते असं लोकांना वाटतं. अशा प्रथा पाळल्या तर महिलांना पुत्रप्राप्ती होऊ शकते असाही गैरसमज आहे. आजारपणं बरी होऊ शकतात तसंच पाऊस पडू शकतो असे अनेक दावे केले जातात.




0 Comments