मुंबई : चेंबूर येथील आदित्य बिर्ला सेंटर फॉर वेल्फेअर ऑफ चिल्ड्रेन या संस्थेच्या बालगृहातून पाच मुले गायब झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात अपहरणाच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील चेंबूर येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. १७ ते २० डिसेंबर या कालावधी दरम्यान ही मुले बालगृहातून गायब झाल्याचे समोर आले आहे. ही सर्व मुले १२ ते १७ वर्षे वयोगटातील आहेत. याप्रकरणी बालगृह प्रशासनाच्या तक्रारीनंतर चेंबूर पोलिस ठाण्यात अपहरणाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्य बिर्ला सेंटर फॉर वेल्फेअर ऑफ चिल्ड्रेन या संस्थेच्यावतीने चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये बालगृह चालविले जाते. अनाथ, निराधार, भिक्षा मागताना पोलिसांनी पकडलेली १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुले या ठिकाणी ठेवली जातात. राज्य सरकारच्यावतीने अनुदान मिळत असल्याने या संस्थेमार्फत१८ वर्षापर्यंत मुलांचा सांभाळ केला जातो.
माटुंगा येथील डेव्हिड ससून बालगृहातून एका १७ वर्षाच्या मुलाला आदित्य बिर्ला सेंटर फॉर वेल्फेअर ऑफ चिल्ड्रेन या संस्थेच्या बालगृहात पाठविण्यात आले होते. १७ डिसेंबर रोजी नेहमीच्या हजेरीच्या वेळी हा मुलगा बालगृहात नसल्याचे आढळून आले. चेंबूर पोलिसांनी आणलेल्या १३ वर्षाचा मुलगा देखील १७ डिसेंबरला गायब झाला. दुसऱ्याच दिवशी १८ डिसेंबरला कुर्ला रेल्वे पोलिसांनी पकडून आणलेला १७ वर्षाचा मुलगा बालगृहातून गायब झाला.
कुर्ला रेल्वे पोलिसांना सापडलेला १४ वर्षाच्या मुलाचे पालक सापडेपर्यंत त्याला या बालगृहात ठेवण्याच्या सूचना बालसमितीने दिले होते. त्यानुसार हा मुलगा या बालगृहात होता. २० डिसेंबर रोजी अचानक हा बालगृहातून गायब झाला. बोरिवली पोलिसांनी पकडून आणलेला १५ वर्षाचा मुलगा देखील याच दिवसापासून बालगृहात दिसून आला नाही. चार दिवसात बालगृहातून पाच मुले गायब झाल्याने या प्रकाराची गंभीर दखल घेत बालगृह प्रशासनाने याबाबत चेंबूर पोलिस ठाण्यात तक्रार केली. हे सर्व मुले अल्पवयीन असल्याने चेंबूर पोलिसांनी अपहरणाचे पाच गुन्हे दाखल केले आहेत.




0 Comments