अवघ्या १५ दिवसांवर लग्न येऊन ठेपलेल्या जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील २८ वर्षीय युवा शेतकऱ्याने गायगाव येथे रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली. अजय उर्फ गजानन रामनाम भोंबळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मोरगाव भाकरे येथील होतकरू युवा शेतकरी अजय याच्याकडे वडिलोपार्जित आठ एकर कोरडवाहू शेती आहे. शेतीत तो पारंपरिक पिके घेत होता.
अजयचे शिक्षण बारावीपर्यंत झाले होते. २७ जानेवारी रोजी त्याचे लग्न होऊ घातलेले होते. दरम्यान, १२ जानेवारीला सायंकाळी गायगाव रेल्वेस्थानकासमोर रेल्वेखाली स्वतःला झोकून देत अजयने आपले जीवन संपवले.
लग्नाची तयारी सुरू असताना या घटनेने दोन्ही परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नसते तरी सततची नापिकी आणि बँकेच्या कर्जाला कंटाळून अजयने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.
येत्या २७ जानेवारीला अजयचे लग्न होणार होते. लग्नाची दोन्ही परिवाराकडून जोरात तयारी सुरू होती. लग्नासाठी कपडा, सोन्याचे दागिने आदी खरेदीही झाली होती. लग्नाच्या १५ दिवस अगोदर वराने टोकाचे पाऊल उचलल्याने दोन्ही कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
0 Comments