शेतात जातो म्हणुन घरातुन गेला, परत आलाच नाही , तरूनासोबत घडली भयंकर घटना

 

राज्यात गुन्हेगारीच्या घटनेत मोठी वाढ होत असतानाच, जालना  जिल्ह्यातून एक भयंकर घटना उघडकीस आली आहे.

एका ३१ वर्षीय तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला आहे. रत्नदीप भांबळे (वय ३१) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी हसनाबाद पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे


प्राप्त माहितीनुसार, भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे गावात ही धक्कादायक घटना घडली. मृत रत्नदीप भांबळे हा तरुण मंगळवारी (31 जानेवारी) सकाळी आपल्या भावाला दुचाकीवरून थिगळखेडा फाट्यावर सोडवण्यासाठी गेला होता. तेथून परत आल्यानंतर त्याने घरात किराणा दुकानातून सामान आणून दिले. त्यानंतर तो दुपारी १ वाजेच्या सुमारास शेतात जातो म्हणून घरातून गेला. पण तो घरी परत आलाच नाही.


संध्याकाळ होऊनही रत्नदीप हा घरी न आल्याने भावाने त्याच्या मोबाईलवर कॉल केला. मात्र, रत्नदीपचा मोबाईल बंद येत होता. कुटुंबीयांची चिंता वाढू लागल्याने नातेवाईकांसह गावातील इतर मंडळींनी शेतात जाऊन त्याचा शोध घेतला. तेव्हा शेतातील आंब्याच्या झाडाखाली नातेवाईकांना रत्नदीपची चप्पल आढळून आली. नातेवाईकांनी शेजारील विहिरीत डोकावून बघितले असता, त्यांना रत्नदीपचा मृतदेह दिसून आला

विहिरीशेजारी आणि चप्पलेवर रक्ताचे डाग दिसून आल्याने नातेवाईकांचा संशय अधिकच बळावला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांनी  दिली. माहिती मिळताच, पोलिस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिग बहुरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रत्नदीपचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.


रत्नदीपच्या अंगावर पोलिसांना मारहाणीच्या जखमा दिसून आल्या. या प्रकरणी हसनाबाद पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा तसेच पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास जलद गतीने करा, असे आदेश पोलिस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिले आहेत. भरदिवसा तरुणाची हत्या झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments