पत्रकारांनी दबाव गट निर्माण करावा: खोरे; पंढरीत पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न

पंढरपूर: प्रतिनिधी

    समाजाला भेडसावणार्‍या समस्या प्रभावीपणे मांडून पत्रकारांनी समाजाभिमूख काम


करणे  गरजेचे आहे. राजकीय, प्रशासकीय यंत्रणेवर आपला वचक निर्माण करून सामाजिक प्रश्‍न सोडवावेत.  हे काम करताना येणारे अडथळे दुर करण्याकरीता पत्रकारांनी व्यवस्थेवर दबावगट निर्मार करावा असे प्रतिपादन गांधीवादी विचारवंत व ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी केले.

पंढरपूर येथे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आयोजित केलेल्या पत्रकार सत्कार समारंभ प्रसंगी पत्रकारांना मार्गदर्शन करताना खोरे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार सिध्दार्थ ढवळे होते. पत्रकार अभय जोशी, विनायक हरिदास यांची पंढरपूर अर्बन बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल तर शिवाजी शिंदे यांची हमाल-मापाडी महामंडळाच्या खजिनदारपदी निवड झाल्याबद्दल श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने खोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

यावेळी पुढे बोलताना खोरे म्हणाले की, पंढरपूर हे तिर्थक्षेत्र असले तरीही या भागातील रस्त्याच्या समस्या, पिण्याचे पाणी, सांडपाणी, स्वच्छता याच्या समस्या अनेक वर्षांपासून पाहतोय जशाच्या तशाच आहेत. कोट्यावधी रुपयांचा निधी येतो मात्र विकास न होताच निधी जातो कोठे हे समजत नाही. नदीपात्र स्वच्छता, शौचालये, मेहतर समाज यांचे प्रश्‍न यात्रा काळात उदभवतात. याकडे पत्रकारांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. अंमलबजावणी होत नसेल तर पत्रकारांनी स्वतंत्रपणे दबावगट तयार करुन दबावगटाच्या माध्यमातून चांगली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन
त्यांनी केले.

यावेळी सिद्धार्थ ढवळे, अभय जोशी, शिवाजी शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष नवनाथ पोरे यांनी प्रास्ताविक केले तर संजय वाईकर यांनी सुत्रसंचालन केले. दत्तात्रय खटवटे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी पत्रकार सुनिल उंबरे, सुनिल दिवाण, प्रशांत आराध्ये, अतूल बडवे, अभिराज उबाळे, सतिश बागल, प्रा. अशोक डोळ, प्रविण नागणे, महेश खिस्ते, महालींग दुधाळे, राजकुमार शहापूरकर,  माउली डांगे, विजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments