गणेश जाधव
पंढरपूर (प्रतिनिधी):- सांगोला-पंढरपूर मार्गावर रस्त्याच्या कामासाठी उभारलेल्या केमिकल फॅक्टरीमधील विषारी केमिकलमुळे खर्डी येथील शेतकर्याच्या डाळींबाच्या बागेचे अतोनात नुकसान झाले आहे. लाखो रुपयांचा फटका या शेतकर्याला बसला आहे. शासकीय व प्रशासकीय यंत्रणेकडे नुकसान भरपाईसाठी वारंवार पाठपुरावा करुन हतबल झालेल्या या शेतकर्याने अखेर सोलापूर येथील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
यासंदर्भातील अधिक माहिती अशी की, मौजे खर्डी, ता. पंढरपूर येथील शेतकरी सौ. मंदाकिनी तात्या जाधव यांच्या स्वमालकीची शेतजमीन गट नं. 1007/1 यामध्ये सरासरी 5 एकर डाळींब आहे. या शेतीलगतच सांगोला-पंढरपूर रस्त्याचे काम करणार्या आर.के. चव्हाण या कंपनीचा केमिकल प्लँट (कारखाना) आहे. या प्लँटमधील केमिकल मिश्रीत रसायनामुळे सौ.मंदाकिनी जाधव यांच्या 5 एकर डाळींब बागेचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासुन डाळींब बागेमधून सदर शेतकर्यास मिळणारे उत्पन्न थांबले आहे. यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सौ.मंदाकिनी जाधव यांनी यासंदर्भात आ. भारत भालके यांच्याकडे आपली व्यथा मांडल्यानंतर आ.भारत भालके यांनी मुख्यमंत्री, महाराष्ट्र यांना यासंदर्भात लेखी पत्र पाठवुन संबंधीत शेतकर्यास न्याय मिळुन नुकसान भरपाई मिळावी याबाबतची विनंती केली होती. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, सोलापूर आदी सर्वच ठिकाणी जाधव यांनी न्याय मागितला परंतु अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही.
सौ.मंदाकिनी तात्या जाधव त्यांचे पती, तीन मुले, तीन सुना चार नातु असा मोठा परिवार आहे. सर्व कुटूंबाचा आर्थिक भार हा शेतीपासुन मिळणार्या उत्पन्नावर अवलंबुन आहे. मुलगा गणेश तात्या जाधव यांच्यावर संपुर्ण कुटूंबाची जबाबदारी आहे. डाळींब बाग लावण्यासाठी त्यांनी कर्ज काढुन 10 लाख रुपये खर्च केले आहेत. परंतु या केमिकल फॅक्टरीमुळे गेल्या दोन वर्षापासुन डाळींबाच्या बागेपासुन कोणतेही उत्पन्न मिळालेले नाही. यामुळे सध्या जाधव कुटूंबीय प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. गणेश जाधव यांनी न्यायासाठी सर्वत्र प्रयत्न केले. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ सोलापूर येथील उपप्रादेशिक अधिकारी आवताडे यांनी डाळींब बागेची व सदर प्लॅन्टची पाहणी केली परंतु डाळींब बागेच्या झालेल्या नुसानीबाबतचा अहवाल सादर करणेकामी टाळाटाळ केली आहे. त्यामुळे नुकसान भरपााई मिळणेकामी कार्यवाही होत नाही. गेल्या सहा महिन्यापासुन प्रांताधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे पाठपुरावा सुरु असुन आ.भारत भालके यांनीसुध्दा याबाबत मुख्यमंत्री यांना पत्र पाठविलेले आहे. परंतु अद्यापही न्याय मिळालेला नाही. यामुळे गणेश तात्या जाधव यांनी आपण येत्या 22 एप्रिल 2019 रोजी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, सोलापूर यांचे कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे. जिल्हाधिकारी सोलापूर, प्रांताधिकारी, पंढरपूर व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ सोलापूर येथील उपप्रादेशिक अधिकारी आवताडे यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.
-------------------------------------------------------






0 Comments