पालकमंत्री विजय देशमुख यांच्या कडून स्वागत
सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी
डॉ.राजेंद्र भोसले यांची ब्रम्हानंदी टाळी
पंढरपूर दि. 6 : आषाढी वारी सोहळ्यात श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनाच्या ओढीने आळंदीतून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे आगमन झाले. पालकमंत्री विजय देशमुख यांनी माऊलींच्या पादुकांचे पूजन करून पालखीचे स्वागत केले.
पालकमंत्री सुध्दा हाती टाळ घेऊन विठुनामात दंग झाले
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी स्वागत समारंभास, आमदार रामहरी रुपनर, पंचायत समिती सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू मृणालिनी फडणवीस, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांत अधिकारी शमा ढोक-पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, चंचल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार, तहसीलदार अभिजित पाटील, गट विकास अधिकारी स्मिता पाटील आदी उपस्थित होते.
माऊलींच्या पालखीचे आगमन सकाळी 11.00 च्या सुमारास धर्मपुरी येथे झाले. तत्पूर्वी सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे,अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, उपविभागीय अधिकारी संतोष जाधव तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांनी माऊलींच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला.
पालखी आगमनापूर्वी आयोजित कार्यक्रमात धर्मपुरी येथे पर्यावरण निर्मल वारी पथक, पोलीस प्रबोधन पथक सहभागी झाले होते. तसेच भारुड, प्रवचन यासारख्या माध्यमातून वारक-यांमध्ये जागृती करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आले. पालखीचे आगमन झाल्यानंतर पालखीसमवेत पालकमंत्री विजय देशमुख तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले दिंडी सोबत चालले. धर्मपुरी येथे विसावा घेऊन माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी नातेपुतेकडे रवाना झाली.


















0 Comments