सुमारे दहा हजार अधिकारी कर्मचारी,
विद्यार्थी व समाजिक संस्थांचा सहभाग
आषाढी यात्रेच्या पार्श्वभुमीवर आज पहाटेच भुवैकुंठ पंढरी नगरीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानामध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उप विभागीय अधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, तहलिसदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके,मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी हाती झाडु घेतला आणि "झाडु संतांचे मार्ग- करु पंढरीचा स्वर्ग" या उक्तीला साजेसे असेच हे स्वच्छता अभियान पार पडल्याचे दिसुन आले.
पंढरपूर दि. 02 :- सोलापूर जिल्हा प्रशासनाने आज राबविलेल्या महास्वच्छता अभियानात 08 टन कचरा गोळा करण्यात आला. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या अभियानात सुमारे दहा हजार अधिकारी व कर्मचारी , सिंहगड व स्वेरी कॉलजचे विद्यार्थी तसेच सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या.
पंढरपुरातील, मंदीर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, पत्राशेड दर्शन बारी, भक्ती मार्ग, वाखरी, 65 एकर आणि नदीपात्रातील वाळवंट येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रत्येक ठिकाणासाठी स्वतंत्र पथके करण्यात आली होती. तीन ट्रॅक्टर , एक ट्रक, दोन कॉम्पॅक्टर व सुमारे 15 घंटा गाड्यांच्या साहाय्याने हा कचरा शहराबाहेर हलविण्यात आला.

महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या हस्ते नामदेव पायरी येथे करण्यात आला. यावेळी, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उप विभागीय अधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, तहलिसदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके,मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
पंढरपूर येथे दिनांक 6 ते 17 जुलै 2019 याकालावधीत आषाढी यात्रा संपन्न होणार आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे 10 ते 12 लाख वारकरी येतात. आषाढी वारीपूर्वी आणि वारीनंतरही पंढरपूरात स्वच्छता राहावी यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. वारीसाठी येणार्या वारकर्याला विठ्ठल-रुक्मिणी दर्शनाबरोबरच, शहरातील व परिसरातील स्वच्छता पाहून समाधान वाटावे हाच मुख्य हेतू या अभियानाचा असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले. कोणत्याही प्रकारचा कचरा किंवा आजाराचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेतली जाणार असून, भाविकांना कोणत्याही आरोग्याच्या समस्येस सामोरे जावे लागू नये यासाठी महास्वच्छता अभियान राबविण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
महास्वच्छता अभियानात पंढरपूरच्या स्वच्छतेसाठी आणि वारकर्यांच्या सेवेसाठी पंढरपुरात आलेल्या शासकीय अधिकारी-कर्मचारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांनी काम केले. हातात झाडू घेऊन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी नामदेव पायरी येथून स्वच्छतेला प्रारंभ केला. त्यांनी प्रदक्षिणा मार्ग, दर्शरांग, व नदीपात्रात स्वच्छता केली. तसेच प्रदक्षिण मार्गावर कोठेही खड्डे,कचखडी राहणार नाही याची पाहणी केली. जिल्हातील सर्व विभागांचे प्रमुख व संबधित अधिकारी यांना यावेळी जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी आवश्यक सूचना दिल्या.




0 Comments