पंढरपूर : “स्वातंत्र्यानंतर देशात कायद्याचे राज्य आल्याने भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान हक्क व अधिकार दिले आहेत. त्यामुळे स्त्रीयांना समानतेची वागणूक मिळत आहे. स्त्री-पुरुष हे समाजव्यवस्थेचे
महत्वाचे घटक असल्याने त्यांच्यामध्ये समन्वय असला पाहिजे. बळाचा वापर करुन कोणी तुमचे घटनादत्त अधिकार नाकारत असतील तर त्याविरोधात आपणास न्यायालयात दाद मागता येते. कायदा हा हक्क व
अधिकारांसह त्याचे संरक्षण करण्याची व्यवस्था ही देतो. याची समाजात जागृती व्हावी.” असे मत सह दिवाणी न्यायाधीश एस. एच. इनामदार यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात पंढरपूर तालुका विधी सेवा समिती व पंढरपूर अधिवक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कायदेविषयक शिबिरा’त प्रमुख
मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सह दिवाणी न्यायाधीश एम. आर. जाधव, प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, उपप्राचार्य डॉ. एन. एन. तंटक आदी मान्यवर उपस्थित होते.
‘कायदेविषयक शिबिरात’ ‘पीडितांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईची उपाययोजना’ या विषयावर बोलताना अॅड. सी. एस. बनसोडे म्हणाले की, “अल्पवयीन मुलां-मुलींच्या लैंगिक शोषणाबद्दल अत्याचारी
घटकांकडून आर्थिक दंड वसूल करुन त्यातील कांही रक्कम पीडितांना नुकसान भरपाई म्हणून दिली जाते.
न्यायालयात नकारात्मक मानसिकतेतून आलेल्या व्यक्तिला समाधान मिळवून देण्याचा न्यायप्रक्रियेतून प्रयत्न केला जातो.” ‘कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे लैंगिक शोषण विरोधी कायदा’ या विषयावर
बोलताना अॅड. व्ही. एम. शेळके म्हणाले की, “शब्द, फिल्म व शारीरिक स्पर्श या माध्यमातून महिलांचे लैंगिक शोषण केले जाते. समाजातील ३० ते ४०% युवक महिलांना मानसिक त्रास देतात. अशा स्वरुपाच्या त्रासाचा प्रतिबंध करण्यासाठी कायद्यामध्ये खूप तरतुदी आहेत. महिलांनी लैंगिक त्रासाच्या विरोधात पोलीसांकडे तक्रार नोंदविल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होते. यातील पीडित व्यक्तीसंबंधी गुप्तता पाळली जाते. त्यामुळे महिलांनी लैंगिक शोषणाविरोधात सजग राहिले पाहिजे.”
अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश एम. आर. जाधव म्हणाले की, “ड्रग्नच्या सेवनाचा माणसाच्या शरिर, मन, मेंदूवर परिणाम होतो.परिणामी त्याचे आर्थिक नुकसान होवून त्याच्या कुटुंबाची वाताहत होते. समाजातील १७ टक्के लोक विविध ड्रग्जचे व्यसन करतात. त्यातील ६० टक्के लोक जीवनात बर्बाद होतात.

म्हणून युवकांनी तरुण वयात व्यसनांपासून दूर राहिल्यास सनाधिनतेचा धोका टळतो. युवकांनी विद्यार्थीदशेत खूप मेहनत व अभ्यास केल्यास त्यांना उज्ज्वल भविष्य आहे. त्यामुळे ड्रग्जची निर्मिती करणे, त्याची विक्री करणे व व्यवसाय करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी अशा कृत्यांपासून दूर राहिले पाहिजे” या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. बी. व्ही. मुळे यांनी केले. या कार्यक्रमास सिनिअर महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. राहूल बोडके यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार उपप्राचार्य बी. जे. तोडकरी यांनी मानले.




0 Comments