Pandharpur Live :
विधानपरिषद लक्षवेधी :
नागपूर अधि.वृ.वि.67
दि.20.12.2019
अपूर्ण एसआरए प्रकल्प पूर्ण करण्यासंदर्भात
मार्ग काढण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमणार
- जयंत पाटील
नागपूर, दि. 20 : मुंबई शहर, उपनगरातील झोपडपट्टी पुनर्विकास धोरणानुसार (एसआरए) पुनर्विकासाचे प्रकल्प पूर्ण व्हावेत, ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी विधीमंडळ सदस्य व या क्षेत्रातील तज्ज्ञांची एक समिती नेमणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जंयत पाटील यांनी आज विधानपरिषदेत केली.
सदस्य सर्वश्री किरण पावसकर, हेमंत टकले, आनंद ठाकूर, ख्वाजा बेग, श्रीमती विद्या चव्हाण यांनी एसआरए संदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सुचनेवर मंत्री श्री. पाटील बोलत होते.
श्री. पाटील म्हणाले, एसआरएनुसार अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली जाते. मात्र पुढे अडचणी येतात व विकासक ते प्रकल्प पूर्ण करत नाही. प्रकल्प सुरू करताना विकासकाने मान्य केलेल्या अनेक गोष्टी इमारतीमध्ये केल्या जात नाहीत. त्यामुळे तो प्रकल्प रखडला जातो. अशा प्रकल्पांची छाननी करून त्यावर निर्णय घेण्यासाठी झोपडपट्टी प्राधिकरणाकडे पाठविण्यासाठी ही समिती काम करेल. तसेच इमारती दर्जासंदर्भातही ही समिती सूचना करेल.
पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना देण्यात येणाऱ्या थकित भाड्यासंदर्भातही तातडीने पुढील आठवड्यात बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल. तसेच एसआरए धोरणानुसार राबविण्यात येणारे प्रकल्प सुरळीतपणे होण्यासाठी व सामान्य मुंबईकरांच्या हितासाठी राज्यशासन योग्य ती कार्यवाही करेल, असेही त्यांनी सांगितले.
या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री किरण पावसकर, सुरेश धस, विद्या चव्हाण, भाई गिरकर, जोगेंद्र कवाडे यांनी भाग घेतला.
००००
साखर कारखान्यांना आर्थिक संकटातून
बाहेर काढण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील - सहकार मंत्री जयंत पाटील
नागपूर, दि. 20 : राज्यातील साखर कारखान्यांची सध्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व या स्थितीतून या क्षेत्राला बाहेर काढण्यासाठी राज्यशासन प्रयत्न करणार असल्याचे सहकार मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे सांगितले.
विधानपरिषदेत सदस्य श्री. सदाशिव खोत यांनी साखर कारखान्यांच्या एफआरपी संदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सुचनेवर श्री. पाटील बोलत होते.
श्री. पाटील म्हणाले, राज्यातील साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना थकित एफआरपीची रक्कम देण्यासंदर्भात साखर आयुक्तांकडून प्रयत्न करण्यात येत असून सन 2018-19 या पूर्वीच्या गळीत हंगामातील थकित 1557.59 कोटी रक्कमेपैकी 84 टक्के म्हणजेच 1305.44 कोटी रक्कम वसूल करण्यात आली आहे. उर्वरित थकीत रक्कम वसूल करण्याची कार्यवाही सुरू आहे. साखर कारखान्यांच्या आर्थिक अवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. कारखान्यांना यातून बाहेर काढून साखर उद्योगाला पुनरुज्जीवीत करण्यासाठी कार्यक्षम कारखान्यांना मदत करण्याचे काम राज्यशासन करणार आहे. आर्थिक संकटात असलेल्या कारखान्यांचे पुनर्रचना करण्याचा विचार सुरू आहे. तसेच नाबार्डच्या सुचनांमुळे एनडीआर चांगला नसेल तर बँका कारखान्यांना कर्ज देत नाहीत. याविषयावरही ‘नाबर्ड’शी बोलून मार्ग काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले
यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री रामराव पाटील, सुरजितसिंह ठाकूर आदींनी सहभाग घेतला.
००००
अवैध सावकारीविरुद्ध कारवाई टाळणाऱ्या
अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईच्या शिफारसीसाठी समिती - जयंत पाटील
नागपूर, दि. 20 : राज्यातील अवैध सावकारींना आळा घालण्यासाठी व अशा सावकारांविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची शिफारस करण्यासाठी विधानपरिषद सदस्य विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची घोषणा सहकार मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे केली.
विधान परिषदेत सदस्य श्रीमती विद्या चव्हाण यांनी नियम 93 अन्वये अवैध सावकारी संदर्भात उपस्थित केलेल्या अल्पकाळ चर्चेला उत्तर देताना श्री. पाटील बोलत होते.
श्री. पाटील म्हणाले की, माजी मंत्री आर.आर. पाटील यांनी अवैध सावकारी विरोधात कायदा आणला. या कायद्याची कडक अमंलबजावणी करण्याच्या सूचना सर्व जिल्हा उपनिबंधकांना दिल्या आहेत. मात्र, अवैध सावकरांविरुद्ध सहकार विभागातील जिल्हा उपनिबंधक कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी गंभीर आहेत. अशा अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची शिफारस करण्यासाठी तसेच अवैध सावकारी कायद्यात सुधारणा सुचविण्याचे काम ही समिती करणार आहे. या समितीमध्ये विधानपरिषद सदस्य सर्वश्री ख्वाजा बेग, सुरेश धस, गिरीश व्यास यांचा समावेश असेल. अवैध सावकारांना जरब बसविण्यासाठी या समितीने सुचविलेल्या सुचनांची समावेश कायद्यात करण्यात येईल.
सदस्य सर्वश्री ख्वाजा बेग, सुरेश धस, गिरीश व्यास यांनी या चर्चेत सहभाग घेतला.
००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/20.12.2019
नागपूर अधि.वृ.वि.63
दि.20.12.2019
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे अमरावतीत आगमन
अमरावती, दि. 20 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथील हेलिपॅडवर आज सकाळी 9 वाजता आगमन झाले.
महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहु, विभागीय आयुक्त पियूष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी संजय पवार, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, पोलीस अधिक्षक हरीबालाजी एन, महापालिका आयुक्त संजय निपाणे, कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र. कुलगुरु राजेश जयपूरकर आदींनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल यांचे स्वागत केले. त्यानंतर पोलीस पथकाव्दारे राज्यपाल यांना मानवंदना देण्यात आली.
००००
नागपूर अधि.वृ.वि.64
दि.20.12.2019
विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर यश संपादन करावे
- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
अमरावती, दि. 20 : आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी उपलब्ध साधनसामुग्रीच्या आधारावर एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली आहे. विद्यार्थ्यांमधील क्रीडागुण हेरून विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षणासह साधनसामुग्री उपलब्ध करून दिल्यास हे विद्यार्थी जागतिक किर्तीचे होऊ शकतील. विद्यार्थ्यांनीही सातत्यपूर्ण मेहनत, जिद्दीने जागतिक पातळीवर यश संपादन करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात आयोजीत आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पद्मश्री प्रभाकरराव वैद्य हे होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, महापौर चेतन गावंडे, प्रधान सचिव मनिषा वर्मा, विभागीय आयुक्त पियूष सिंह आदी उपस्थित होते.
श्री. कोश्यारी म्हणाले की, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी एव्हरेस्टची चढाई केल्याचे कौतुक आहे. आपल्यातील तीन विद्यार्थ्यांनी हे लक्ष्य ठेवले आणि पूर्ण केले. येत्या काळात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनीही अशाच प्रकारचे भव्य लक्ष्य ठेऊन ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत.आश्रमशाळेत राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी मेहनत आणि जिद्दीने स्पर्धेत सहभागी होऊन यशस्वी व्हावे.
केंद्र आणि राज्यशासन विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करीत आहेत. यासाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा. स्पर्धेत सहभागी व्हावे. शिक्षकांनीही त्यांना प्रोत्साहित करावे. योग्य प्रशिक्षणाने हे विद्यार्थी ऑलिंपिकमध्ये सहभागी होऊन पदक प्राप्त करतील, असा विश्वास श्री. कोश्यारी यांनी व्यक्त केला.
सुरूवातीला राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे पारंपरिक नृत्याने स्वागत करण्यात आले. त्यांनतर राज्यपाल यांनी मिशन शौर्य, अटल आरोग्य वाहिनी, कायापालट, कौशल्य विकास, पेसा, कराडी पथ आदी गॅलरीचे उद्घाटन केले. राणी दुर्गावती आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन झेंडावंदन आणि दीपप्रज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. राज्यपाल यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलीत केली. राज्यपाल यांना सहभागी खेळाडूंनी मानवंदना दिली.
केंद्रीय राज्यमंत्री श्री. धोत्रे यांनी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात अनेक नामवंत खेळाडू घडले आहेत. अशा ठिकाणी या स्पर्धा होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. स्पर्धेसाठी आवश्यक असलेले सहकार्य करण्यात येईल. तसेच अशा स्पर्धांमधून आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
श्रीमती वर्मा यांनी प्रास्ताविक केले. नागपूर आदिवासी आयुक्त कार्यालयाने आश्रमशाळा तपासणीसाठी तयार करण्यात आलेल्या ई-निरिक्षण अॅप, तसेच क्रीडा स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले.
००००
नागपूर अधि.वृ.वि.65
दि.20.12.2019
राज्यपालांच्या हस्ते वसतिगृहाचे उद्घाटन
अमरावती, दि. 20 : येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात उभारण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले.
सुमारे दीड कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या वसतीगृहामुळे विद्यापीठात संशोधन करणाऱ्या 25 संशोधक छात्रांच्या निवासाची सोय होणार आहे.
यावेळी केंद्रीय मानव संसाधन विकास खात्याचे राज्यमंत्री संजय धोत्रे, कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यास पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
0000
नागपूर अधि.वृ.वि.66
दि.20.12.2019
ज्ञानाचा उपयोग करताना देशहिताला सर्वोच्च प्राधान्य द्या
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
अमरावती, दि. 20 : मूल्यांशिवाय शिक्षण व्यर्थ आहे, याची तरुण पिढीने जाणीव ठेवावी आणि शिक्षणासोबत प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग करताना देशहित सदैव डोळ्यासमोर ठेवावे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा छत्तिसावा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून केंद्रीय मानव संसाधन विकास , दुरसंचार, इलेक्ट्रानिक्स, माहिती तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री संजय धोत्रे उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र- कुलगुरु राजेश जयपूरकर, यांच्यासह विविध अधिष्ठाता, व्यवस्थापन समिती सदस्यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
दीक्षांत समारंभात पारंपरिक उपदेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राज्यपाल म्हणाले, आज विविध पदके आणि पारितोषिके मिळविणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण मोठे आहे, हे पाहून आपल्याला अत्यंत आनंद झाला आणि समाधान वाटले. सर्व मुलींचे आपण मनापासून कौतुक करतो. या मुलींच्या कामगिरीचा समाजातील अपप्रवृत्तीना धाक वाटेल.
आपला देश मोठ्या कष्टाने आणि अनेकांच्या बलिदानानंतर स्वतंत्र झाला आहे. इतिहासात या देशाचा मोठा लौकिक होता. तोच लौकिक पुन्हा मिळवून देण्यासाठी आज प्रयत्न होत असताना विद्यार्थ्यांनी या प्रयत्नांमध्ये सर्व शक्तीनिशी सहभागी होण्याचा संकल्प केला पाहिजे. देशनिष्ठा आणि देशासाठीचे कर्तव्य या सर्वोच्च बाबी आहेत, याची सदैव जाणीव ठेवली पाहिजे. आयुष्यात छोट्या वाटणाऱ्या बाबींना मोठे महत्व असते. छोट्या छोट्या गोष्टी मुल्यांचा संस्कार करतात, असेही राज्यपाल म्हणाले.
पदवी प्राप्त करण्याचा दिवस हा साफल्याचा दिवस असून आज ज्यांना पदवी प्राप्त होत आहे, त्यांची साधना यशस्वी होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील आयुष्यातही मेहनतीवर विश्वास ठेवा असे ते म्हणाले.
यावेळी राज्यपालांनी नेहमी खरे बोला, कर्तव्याचे पालन करा, आत्मोन्नती होईल असे वाचन करा, कर्तव्यापासून विचलित होऊ नका, मानवजातीचा हिताचा व उत्कर्षाचा विचार करुन निर्दोष कर्माचेच आचरण करा व सदाचाराचे अनुकरण करा असा पारंपरिक दीक्षांत उपदेश संस्कृत श्लोकांच्या माध्यमातून केला. आपल्या दीक्षांत भाषणात केंद्रीय मंत्री धोत्रे यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधन परंपरेशी नाते टिकवून ठेवण्याचे आवाहन केले.
आज विज्ञान-तंत्रज्ञान- उद्योग या क्षेत्रात नवकल्पनांना महत्व प्राप्त झाले आहे, असे नमूद करुन राज्यमंत्री धोत्रे म्हणाले की, ग्रामीण जीवनातील कल्पकतेतून विद्यार्थ्यांनी नवकल्पनांबाबत प्रेरणा घ्यावी. आज उभ्या असलेल्या समस्या सोडविण्यासाठी आपण संपादन केलेल्या ज्ञानाचा उपयोग करा असे आवाहन त्यांनी केले. व्यावसायिक शिक्षण हा उच्च शिक्षणाचा अविभाज्य भाग असणे तसेच व्यावसायिक शिक्षणात कौशल्याधारीत अभ्यासक्रमाचा समावेश केला जाणे या बाबी महत्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना स्थानिक आणि जागतिक प्रश्नाचे भान हवे असे नमूद करुन त्यांनी महिलांवर अन्याय आणि अत्याचार होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. नैसर्गिक शेती, पर्यावरण रक्षण आदि बाबींचे महत्व त्यांनी अधोरेखित केले.
कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषण केले. आजच्या समारंभात 158 पारितोषिकांचे वितरण केले जात असून 480 संशोधकाना आचार्य पदवी देवून सन्मानीत केले जात असल्याचे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख आणि विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थितीत होत.
००००
नागपूर अधि.वृ.वि.68
दि.20.12.2019
उन्नत भारत अभियानात समन्वय संस्थेचा आरंभ
समृद्ध व सशक्त भारतासाठी अभियान मोलाची कामगिरी करेल
- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
अमरावती, दि. २० - गावे सुखी व समृद्ध झाली तरच देश उन्नत होईल. समृद्ध व सशक्त भारतासाठी उन्नत भारत अभियान व समन्वय संस्था मोलाची कामगिरी करेल, असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केला.
उन्नत भारत अभियानात विदर्भ विभागीय समन्वय संस्थेचे लोकार्पण राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात झाले, त्यावेळी ते बोलत होते. अमरावतीचे महापौर चेतन गावंडे, अभियानाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष चैनसुख संचेती, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, अभियानाच्या विदर्भ समन्वयक अर्चना बारब्दे आदी यावेळी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, शाश्वत ग्रामविकास घडण्यासाठी व सर्व शासकीय योजना अंतिम घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अभियान महत्वाचे ठरेल. अधिकाधिक संस्था व युवक- युवतींनी अभियानात सहभागी व्हावे. युवकांनी ग्रामीण जनजीवनात मिसळून तेथील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावा. या उपक्रमात सातत्य ठेवून अभियान यशस्वी करावे.
डॉ. भटकर म्हणाले की, अनेक विद्यापीठांच्या समन्वयातून संशोधन व योजनांचा लाभ ग्रामीण नागरिकांना करून देण्याचे अभियानाचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या वैशिष्ट्यानुरूप गरजेवर आधारित नाविन्यपूर्ण योजना राबविणे, योजना गरजूपर्यंत पोहोचविणे, विधायक कार्य करणा-या संस्थांना व्यासपीठ मिळवून देणे आदी कार्ये अभियानात करण्यात येतील.
विदर्भात अभियानात १८ संस्था सहभागी असून, १५ अशासकीय संस्था व ११२ नोंदणीकृत संस्थांचा सहभाग आहे. अभियानात ५६० दत्तकग्राम समाविष्ट आहेत. अभियानात विद्यार्थी ग्रामविकासावर नवीन संकल्पनावर आधारित प्रकल्प सादर करू शकतील. त्याचा लाभ नॅकद्वारे संस्थेचे मूल्यांकन वाढण्यासाठी होणार असून, विद्यार्थ्यांना शासकीय कामाचा अनुभव दिशादर्शक ठरेल, अशी माहिती श्रीमती बारब्दे यांनी दिली.
००००
विधानपरिषद लक्षवेधी-2019
नागपूर अधि.वृ.वि.69
दि.20.12.2019
राज्यातील डम्पिंग ग्राऊंड प्रश्नी समिती
आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न लवकरच सोडवू
- नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
नागपूर दि. 20 : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रांतर्गत असलेल्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडच्या कचरा टाकण्यासंबंधितच्या व अन्य समस्या तेथील स्थानिक नागरीक व प्रशासनाशी चर्चा करून लवकरच सोडवणार असून राज्यातील इतर शहरातील असे प्रश्नही सोडविण्यासाठी समिती स्थापन करु, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.
यासंबंधीची लक्षवेधी सूचना श्री.जगन्नाथ शिंदे यांनी मांडली.
यावेळी शिंदे म्हणाले, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील घनकचरा आधारवाडी डंपिंग ग्राऊंड येथील कचरा डेपोवर (क्षेत्रफळ 5.88 हेक्टर) महानगरपालिका स्थापन होण्याच्या पूर्वीपासून टाकण्यात येतो. सद्यस्थितीत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात प्रतिदिन सरासरी 650 मेट्रीक टन इतका कचरा निर्माण होतो. त्यापैकी 100 मे. टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असून, उर्वरित 550 मे. टन कचरा आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात येतो त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात 12 ठिकाणी शास्त्रोक्त भरावभूमी तयार करण्याचा निर्णय नसून मौजे उंबर्डे, मौजे बारावे व मौजे मांडा या 3 ठिकाणीच शास्त्रोक्त भरावभूमी तयार करणे, 13 ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारणे तसेच घनकचरा वाहतुकीसाठी वाहने खरेदी करणे या बाबींचा स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सविस्तर प्रकल्प अहवालात समावेश करण्यात आला आहे. हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर दैनंदिन 700 मे. टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य होईल. मौजे उंबर्डे व मौजे बारावे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर आधारवाडी येथे कचरा टाकणे बंद करून हे डंपिंग ग्राऊंड शास्त्रोक्तरित्या बंद करण्याबाबतची कार्यवाही महापालिकेस सुरू करता येईल, असे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कळविलेले आहे. राज्यातील शहरांमध्ये डम्पिंग ग्राऊंडच्या समस्या सोडविण्यासाठी समितीची निर्मिती करण्यात येणार असल्याचेही श्री.शिंदे यांनी सांगितले.
या चर्चेत सदस्य सर्वश्री हेमंत टकले, प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी सहभाग घेतला.
0000
छाया उपजिल्हा रुग्णालय प्रकरणी
दोषींवर कारवाई करणार
- जयंत पाटील
नागपूर दि. 20 : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील कै.बी.जी. छाया उपजिल्हा रूग्णालयातील 9 रूग्णांवर उपचार करताना व त्यानंतर झालेल्या त्रासाची उच्च स्तरीय अधिकाऱ्यांकडून चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.
यासंबंधीची लक्षवेधी सूचना श्री.भाई जगताप यांनी मांडली.
यावेळी जयंत पाटील म्हणाले, कै. बी. जी. छाया उपजिल्हा रुग्णालय, अंबरनाथ येथे 12 महिलांना अशक्तपणा, डेंग्युताप, ताप, विषमज्वर इ. आजारामुळे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 9 रुग्णांना तापाच्या उपचारासाठी सेट्रीयाझोन 1 ग्रॅम हे इंजेक्शन रात्री 9 च्या सुमारास देण्यात आले. जंतू संसर्गामुळे येणाऱ्या तापासाठी हे औषध वापरण्यात येते. त्यामुळे चुकीचे औषध दिले हे खरे नाही. इंजेक्शन दिल्यानंतर अर्ध्या तासाने या रुग्णांनी उलट्या व मळमळ होत असल्याची तक्रार केली. रुग्णालयातील डॉक्टरांनी या रुग्णांवर उपचार केले. परंतु उलट्या व मळमळ थांबत नसल्यामुळे इंजेक्शन दिलेल्या 9 रुग्णांना पुढील उपचारासाठी व इंजेक्शन न दिलेल्या 3 रुग्णांना हा त्रास होत नसतानाही विनंतीमुळे मध्यवर्ती रुग्णालय, उल्हासनगर येथे दाखल केले. तेथेही उपचारादरम्यान 9 पैकी 6 रुग्णांच्या उलट्यांची तीव्रता वाढल्याने क्रिटी केअर रुग्णालय, उल्हासनगर येथे स्थलांतरीत करण्यात आले. प्रकृती सुधारल्यामुळे मध्यवर्ती रुग्णालय, उल्हासनगर येथील रुग्णांना दि.4 डिसेंबर, 2019 रोजी तर क्रिटी केअर रुग्णालय, उल्हासनगर येथील दाखल 6 रुग्णांना दि 5 डिसेंबर, 2019 रोजी घरी सोडण्यात आले.
उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे यांचे दि 6 डिसेंबर, 2019 च्या आदेशान्वये या प्रकरणाची चौकशी करण्याकरीता समिती गठित करण्यात आली होती. या समितीने दि 16 डिसेंबर, 2019 रोजी सादर केलेल्या अहवालामध्ये आवश्यकतेनुसार इंजे. सेट्रीयाझोन दिल्याने, निर्जतूक सिरिंज वापरल्याचे तसेच औषधाची मुदत दि 5 फेब्रुवारी, 2021 असल्याचे नमूद केले असून, या इंजेक्शनमुळे यापुर्वी कोणत्याही रुग्णास त्रास झाला नसल्याचेही स्पष्ट केले आहे. तसेच रुग्णांच्या अहवालामध्ये हेच औषध या रुग्णांना दिल्याचे नमूद आहे. या घटनेनंतर इंजेक्शन सेट्रीयाझोनच्या Batch No. 19, Cl-104 चा वापर त्वरीत थांबविण्यात आला असून अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे नमुना तपासणीसाठी देण्यात आलेला आहे. याबाबतचा अहवाल अप्राप्त आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे श्री.पाटील यांनी सांगितले.
तसेच राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रिक्त पदे व अन्य समस्यांचा सर्वकष आढावा घेवून राज्यातील जनतेला चांगल्या आरोग्य सेवा देण्याचा शासन प्रयत्न करणार असल्याचेही श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.
या चर्चेत विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री हेमंत टकले, अनंत गाडगीळ, गिरीष व्यास, अमरनाथ राजूरकर, महादेव जानकर यांनी सहभाग घेतला.
0000
दीक्षाभूमीच्या विकासासाठी मंजूर 100 कोटीपैकी
40 कोटी रु. नागपूर प्राधिकरणाकडे सुरक्षित
- छगन भुजबळ
नागपूर, दि. 20 : दिक्षाभूमीच्या विकासासाठी 2018 मध्ये 100 कोटींच्या कामांना तत्वत: मंजुरी दिली असून त्यापैकी रुपये 40 कोटी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आले आहेत. हा निधी प्राधिकरणाच्या खात्यावर सुरक्षित आहे. दिक्षाभूमीच्या विकासकामांना आवश्यकतेनुसार पाहिजे तेवढा निधी देण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधान परिषदेत दिली.
यासंबंधीची लक्षवेधी सूचना श्री.प्रकाश गजभिये यांनी मांडली.
यावेळी श्री.भुजबळ म्हणाले, प्रधान सचिव, सामाजिक न्याय यांच्या अध्यक्षतेखाली 27 नोव्हेंबर 2019 रोजी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व सबंधित वास्तुशास्त्रज्ञ यांची संयुक्त बैठक घेऊन प्रस्तावित विकास बांधकाम व आराखडा यांचे नियोजन करताना मुख्य स्तुपास बाधा येणार नाही, मुख्य स्तुप दुरुन दिसण्यास अडचण येणार नाही, तसेच मुख्य स्तुपाच्या सौंदर्यास बाधा येणार नाही, याबाबी विचारात घेऊन सुधारित प्रस्ताव तयार करुन तो 15 दिवसात उच्चस्तरीय समितीसमोर सादर करण्याच्या सूचना नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपूर यांना दिल्या. त्याप्रमाणे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सुधारित अंदाजपत्रक प्राप्त करुन घेऊन विभागामार्फत ते उच्चस्तरीय सचिव समितीसमोर सादर करण्यात येणार असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले.
या चर्चेत सदस्य श्री. गिरीष व्यास यांनी सहभाग घेतला.
0 0 0
शिक्षकांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करणार
- शालेय शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात
नागपूर, दि. 20 : राज्यातील मान्यताप्राप्त व अनुदानित खाजगी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालय यातील पुर्णवेळ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना कॅशलेस आरोग्य योजना लवकरच लागू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री श्री.बाळासाहेब थोरात यांनी दिली.
यासंबंधीची लक्षवेधी सूचना श्री.दत्रातय सावंत यांनी मांडली.
यावेळी श्री.थोरात म्हणाले, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती लागू आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय यातील पूर्णवेळ शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना स्वत:साठी अथवा आपल्या कुटुंबियासाठी आरोग्य विभागामार्फत मान्यता दिलेल्या 27 आकस्मिक व 5 गंभीर आजारावरील उपचारार्थ आंतरुग्ण कालावधी झालेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती शासनाकडून करण्यात येते. ही खर्च प्रतिपूर्ती आता कॅशलेस स्वरुपात करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहे.
या चर्चेत सदस्य सर्वश्री डॉ.रणजीत पाटील, श्रीकांत देशपांडे, निरंजन डावखरे, बाळाराम पाटील, श्रीमती मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.
0 0 0
नागपूर अधि.वृ.वि.70
दि.20.12.2019
मुख्यमंत्री यांच्यासह मंत्र्यांसाठी
निवासस्थानाचे वाटप जाहीर
नागपूर, दि. 20 : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांसाठी निवासस्थानाचे वाटप सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केले आहे.
त्यानुसार मुख्यमंत्री यांच्यासाठी वर्षा निवासस्थान, ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांच्यासाठी रामटेक, वित्त मंत्री जयंत पाटील यांना सेवासदन, गृह मंत्री एकनाथ शिंदे यांना रॉयलस्टोन तर सार्वजनिक बांधकाम डॉ.नितिन राऊत यांना पर्णकूटी हे बंगले वाटप करण्यात आलेले आहे. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यांचा संकेतांक 20191202203522907 असा आहे.
००००
नागपूर अधि.वृ.वि.71
दि.20.12.2019
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सागर बंगला
नागपूर, दि. 20 : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल येथील सागर या शासकीय बंगल्याचे वाटप करण्यात आलेले आहे. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून हा आदेश महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
००००
नागपूर अधि.वृ.वि.72
दि.20.12.2019
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना चित्रकुट बंगला
नागपूर, दि. 20 : महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना मलबार हिल येथील चित्रकुट या शासकीय बंगल्याचे वाटप करण्यात आलेले आहे. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून हा आदेश महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
००००
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
8149624977, 7083980165
_________________________________________________
_________________________________________________




0 Comments