आळंदी / प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या इतिहासात प्रथमच कोरोणाचा प्रादुर्भावमुळे कार्तिकी एकादशी भाविक भक्तांन विना मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात साजरी करण्यात आली. कार्तिकी यात्रेच्या दरम्यान संपूर्ण आळंदी शहर आणि पंचक्रोशीत भक्तांची मांदियाळी असते परंतु कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आळंदी आणि आसपासच्या गावात संचार बंदी मुळे शुकशुकाट दिसून येत आहे. मंदिर परिसरात अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून त्यामुळे यापरिसरात शांतता दिसत आहे.
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मध्यरात्रीच्या सुमारास स्वयंसेवकांनी संपूर्ण देऊळवाडा स्वच्छ केला. घंटानाद झाल्यानंतर पहाटे २ ते ३ पर्यंत पवमान अभिषेक करण्यात आला.सनई चौघड्याच्या मंजुळ स्वराने मंदिरातील वातावरण मंगलमय झाले होते.महाद्वार,मंदीरातील सर्व कळसांवर आणि देऊळ परीसरात आकर्षक आणि नेत्रदीपक लाईटींग करण्यात आली तसेच मुख्य गाभारा आणि देऊळवाडा आकर्षक फुलांच्या सजावटीने दरवळला होता.
माउलींच्या समाधीवर पहाटे २ वाजता चांदीचा मुखवटा ठेवून पंचामृत अभिषेक ११ ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चारात करण्यात आला.त्यासाठी दूध,दही,तूप,मध,साखर,आम्रखंड,सुगंधी तेल,उटणे,अत्तर यांचा वापर करण्यात आला.केशरी मेखला,शाल,तुळशीचा हार आणि डोईवर सोनेरी मुकुट ठेवून समाधीला आकर्षक रूप साकरण्यात आले.आरतीनंतर मानकरी आणि सेवेकऱ्यांना नारळप्रसाद देण्यात आला. या वेळी परभणीचे खासदार संजय जाधव,पुणे जिल्हाधिकारी राजीव देशमुख,प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक,विश्वस्त विकास ढगे पाटील,पालखी सोहळा मालक बाळासाहेब पवार,व्यवस्थापक माऊली वीर,राजाभाऊ चोपदार,रामभाऊ चोपदार,बाळासाहेब चोपदार, माऊलींचे मानकरी बाळासाहेब कुर्हाडे,राहुल चिताळकर,अनिल कुर्हाडे,योगेश आरु,आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर,उपनगराध्यक्ष सागर बोरूंदिया,यात्रा सभापती सागर भोसले,आळंदी पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, माजी नगराध्यक्ष सचिन पाचुंदे,रोहिदास तापकीर, शारदाताई वडगावकर, मंदाताई वाघमारे, नगरसेवक सचिन गिलबिले,पांडुरंग वहीले,आदित्य घुंडरे,संदीप रासकर,मीराताई पाचुंदे,पारूबाई तापकीर,सुनिता रंधवे, माजी विरोधी पक्षनेते डि.डि. भोसले,राम गावडे, अजित वडगावकर,प्रकाश काळे आणि आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते.
दुपारी उपवास नैवेद्य दाखवून माऊलींची पालखी नगरप्रदिक्षणा करण्या साठी मार्गस्थ झाली यावेळी कडकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता,पंढरपूर येथील तीन पालख्यांचे सायंकाळी पाच वाजता आगमन झाले, द्वादशीला पहाटे प्रांताधिकारी यांच्या हस्ते पंचोपचार पुजा संपन्न होणार आहे, सायंकाळी ४ ते ७ रथोत्सव होणार आहे. रात्री फडकरी,मानकरी,दिंडीप्रमुख,सेवेकरी यांना खिरापत, पुजा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.



0 Comments