Pandharpur Live Online:
नेरपिंगळाई (जि. अमरावती) : कर्जबाजारी असलेल्या बापाकडे लग्नासाठी पैसे नाहीत... चिंताग्रस्त वडिलांची ही स्थिती पाहवत नसल्याने शेतकऱ्याच्या चोवीस वर्षीय मुलीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही दुर्घटना अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई या गावात शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी उजेडात आली.
मोहिनी अरुण टिंगणे (वय २४) असे घरीच गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे.
सोयाबीन पिकावर खोडकीडा व कपाशीवर बोंडअळी आल्याने पिके उद्ध्वस्त झाली. त्यात वन्यप्राण्यांनी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
वडिलांची आर्थिक परिस्थिती एकदम ढासळलेली. यातच यावर्षी मुलगी मोहिनीचे लग्न करायचे होते. आर्थिक अडचणीमुळे घरात चिंतेचे वातावरण होते. त्यात बॅंकेचे अगोदरच देणे आहे. मग लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव कसे करणार. वडिलांची दयनीय परिस्थिती मुलीला पाहावत नव्हती.
त्यामुळे २५ डिसेंबर रोजी आई-वडील व भाऊ शेतात गेल्यानंतर मोहिनीने घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी आई-वडील घरी परत आल्यानंतर लहानपणापासून अंगाखांद्यावर खेळवलेल्या मुलीचा लोंबकळत असलेला मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला.
वन्यप्राण्यांनी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. अशा परिस्थितीत लग्नासाठी पैसे आणायचे कुठून? या विवंचनेत आई-वडील होते. आई-वडिलांची परिस्थिती पाहून मोहिनीसुद्धा सतत चिंतेत असायची व याच भावनांचा उद्रेक होऊन तिने गळफास घेतला.
शनिवारी (ता. २६) दुपारी एक वाजता शवविच्छेदन करून मोहिनीचे पार्थिव घरी आणले असता नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. दुपारी दीड वाजता मोहिनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसर हादरला असून, गावावर शोककळा पसरली आहे.
नेरपिंगळाई येथील अरुण विठ्ठल टिंगणे यांच्याकडे चार एकर शेती आहे. त्यांनी या जमिनीवर सेंट्रल बॅंकेच्या नेरपिंगळाई शाखेतून एक लाख १८ हजार रुपयांचे कर्ज काढले आहे. यावर्षी निसर्गाची साथ लाभली नाही.


0 Comments