मराठा संघर्ष योध्दा ( Maratha Reservation ) मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) यांनी मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून आमरण उपोषणाची घोषणा बीड येथील सभेत केली. या सभेनंतर ते आंतरवाली सराटी येथे परतले आणि आजारी असल्याने रुग्णालयात दाखल झाले.
Follow the Pandharpur Live News channel on WhatsApp
मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange ) यांची काल बीड जिल्ह्यात विराट सभा पार पडली. मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबरला सरकारला दिलेली मुदत संपत असून, सरकारकडून अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.
या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली आहे. त्यानुसार आता पुढचं आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, “सरकारला तीन चार वेळा वेळ वाढवून दिला. तारखा देखील बदलल्या. आता आपण पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवायची का? तारीख ठरवायची का?
पुन्हा एकदा विचारतोय असं म्हणत बीडच्या सभेतच मनोज जरांगेनी कौल घेतला त्यावेळी सभेतून हो… म्हणून उत्तर आलं. त्यावर चलो मुंबई..! असं म्हणत 20 जानेवारी रोजी मुंबईला आमरण उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं.
मात्र, मागील काही दिवसांपासून सतत सभांसाठी करत असलेल्या दौऱ्यामुळे जरांगे आजारी पडले आहे. त्यामुळे, बीडची सभा झाल्यावर आज मनोज जरांगे थेट छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये पोहचले.
यावेळी डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आला आहे. अंगदुखी आणि खोकल्यामुळे छातीत त्रास होत असल्याने उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलाय.
तसेच, त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरु आहे. विशेष, म्हणजे जरांगे छत्रपती संभाजीनगरला पोहचताच त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात मराठा समाजबांधवांची मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं.


0 Comments