डॉ. प्रकाश बाबा आमटे..

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgxbOZt0BjoeiC1DNAVK0AL8qQ1i30E6DohNSIiQgeD_7BUCwja9T7aQLO229aVcvf9NipOv3Z4e_j-3jeRIR1GYj_sCLRNNjkmsHqpk9TxSCkPdq-QUOB_W5EbYVEtItCHSmXTe-HGU08/s1600/sonali-kulkarni-baba-amte-movie.jpg       मानाच्या पुरस्कारांनी गौरवलेल्या प्रकाश बाबा आमटे या व्यक्तिमत्त्वावर सिनेमा बनवणं हे खरंतर शिवधनुष्य पेलण्यापेक्षाही कठीण. दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांनी नेटाने हे शिवधनुष्य उचललं. मात्र त्यांना ते पेललेलं नाही. नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, मोहन आगाशे यांच्यासारख्या समाजिक भान असलेल्या कलाकारांची नाव चित्रपटाशी जोडली गेल्यावर त्या ही कलाकृती अत्यंत गांभीर्याने बनवत असल्याचं स्पष्ट झालं होतं. 

http://www.marathimovieworld.com/images/prakash-amte-nana-patekar-sonali-kulkarni.jpg          दिग्दर्शिकेने चालवलेली तयारी जोरदार असली तरी सिनेमाबाबत मूळ उत्सुकता होती ती पटकथेची. ती अशासाठी की डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा यांचा संघर्ष ३० वर्षांपेक्षा जास्त काळचा आहे. आज या जोडीला 'ग्लॅमर' मिळू लागलं असलं तरी पूर्वी परिस्थिती तशी नव्हतीच. गोंड, माडिया अशा आदिवासी लोकांचं जगणं सुसह्य व्हावं यासाठी त्यांच्या पूर्वीच्या प्रत्येक दिवसांत संघर्ष ठासून भरलेला होता. मग कुतूहलाचा मुद्दा हा होतो की दिग्दर्शिका प्रकाश आमटे यांच्या आयुष्यातले असे नेमके कोणते टप्पे निवडते आणि त्याचा पट कसा मांडते. एकदा हा टप्पा निश्चित केला की त्या वळणावरचे संघर्ष मोठ्या पडद्यावर अवतरणार हे आलंच. आमटे यांनी अनुभवलेल्या परिस्थितीत ठासून भरलेलं नाट्य आणि त्याला मिळालेली कलाकारांची जोड यांच्यामुळे यातले प्रसंग प्रेक्षकाच्या मनाचा ठाव घेणार हे गृहित आहे. तसे ते घेतातही. मुद्दा अडखळतो तो पटकथेचा. हा सिनेमा पाहताना अनेक प्रसंग आपले छाप सोडतात. पण ते विस्कळीतपणे समोर येतात.. आठवणींच्या तुकड्यांसारखे. त्यामध्ये सुसूत्रतेचा अभाव दिसतो. एक नक्की, की हा सिनेमा पाहताना आमटे दाम्पत्याची प्रत्येक घटनेकडे पाहण्याची सकारात्मकदृष्टी पाहणाऱ्याच्या मनात ठसते.

           प्रकाश आमटे यांच्या 'प्रकाशवाटा'ला समोर ठेवून दिग्दर्शिकेने या सिनेमाची निर्मिती केली आहे. ती करताना आमटे दाम्पत्याने अनुभवलेल्या काही घटनांचे दाखले यात दिसतात. उदाहरणार्थ, डॉक्टरकी संपल्यावर प्रकाश हेमलकसाला यायचा निर्णय घेतो. दरम्यान त्यांना त्याच्याच कॉलेजमध्ये असलेली मंदा आवडते. दोघांचं लग्न होतं. दोघे हेमलकसाला येतात. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत काम सुरू करतात. पण आदिवासी बांधवांचा प्रतिसाद मिळत नाही. अखेर यश येतं.. मग हळूहळू डॉक्टरांवरचा विश्वास वाढतो. लोक उपचार घेऊ लागतात.. वगैरे वगैरे.. अशा टप्प्यांवरून गोष्ट पुढे जाते. हे सर्व प्रसंग चांगले रंगलेत. कारण आमटे यांचा हा अनुभव 'लार्जर दॅन लाइफ' आहे. गडचिरोलीमध्ये नक्षलींचा वावर असलेल्या घनदाट जंगलात शुन्यातून विश्व निर्माण करण्याची कल्पनाही सामान्य माणूस करू शकत नाही. त्यामुळे यातले प्रसंग पाहणाऱ्याला खिळवून ठेवतात.
सिनेमा पाहताना अडचण इतकीच येते की या सर्व प्रसंगांचा ताळा लागत नाही हा एक भाग. आणि दुसरा असा, की या प्रसंगांव्यतिरिक्त सिनेमांमधून फार काही मिळत नाही. उदाहरणार्थ, नुकतंच लग्न होऊन हेमलकसाला आल्यानंतर प्रकाश आणि मंदा यांच्यात काय चर्चा होत असेल? माणूस म्हणून येणारं नैराश्य ही जोडी कशी, कुणावर काढत असेल? ज्याला आपण 'बिटविन द लाइन्स' म्हणू, त्याचा अभाव इथे दिसतो.

                चित्रपटाची सुरुवात झाल्यावरच याचा अंदाज येतो. म्हणजे घनदाट अरण्यात नक्षलींशी दोन हात करणारे जवान दिसतात. ते तेवढेच. त्यानंतर आमटे यांना भेटायला परदेशी पाहुणे येतात. प्रकाश भाऊंना भेटायला ते तलावावर जातात. तिथे आमटे यांना पाहून आनंदीत होतात. पण त्याहून चकीत होतात ते त्यांच्यासोबत आंघोळ करणारा वाघ पाहून. आता या दृश्याचा मोह कोणत्याही दिग्दर्शकाला होणं स्वाभाविक आहे. तो हट्ट पूर्ण करण्यासाठी या सिनेमात ग्राफिकल वाघ आणला आहे. जो फारच बाळबोध वाटतो आणि त्याच्यासोबत चालणारे 'प्रकाश आमटे' पाहून या दृश्याचं हसं होतं.

        या चित्रपटातली जमेची बाजू आहे ती संवादांची. उदाहरणार्थ, 'त्यांना व्यवस्थितचा अर्थ समजला की जाऊ', 'अशी रंगपंचमी तरी कुणाच्या नशिबी आहे?' या अशा छोट्या छोट्या संवादांमुळे आमटेंचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लख्ख कळतो. यातल्या संवादांमुळेच कलाकारांची संवादफेक बदलते आणि नाना पाटेकर यांसारखा आक्रमक अभिनेताही तुलनेने लीन वाटू लागतो. प्रकाश आमटे यांच्या तुलनेत मंदा आमटे यांची व्यक्तिरेखा पटकथेमध्ये दुय्यम बनली आहे. छायांकन नेटकं. गाण्यामध्ये असलेली प्रार्थनाही श्रवणीय झाली आहे. गीतही लक्षात राहणारं.

          या चित्रपटाच्या निमित्ताने नाना पाटेकर बऱ्याच दिवसांनी प्रमुख भूमिकेतून लोकांसमोर येतायंत. डॉ. प्रकाश यांच्याशी साधर्म्य सांगणारी कोणतीही रंगभूषा न करता त्यांनी आमटे साकारण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलंय. अनेक प्रसंगात त्यांची छाप पडते. पण या सर्व प्रसंगांमध्ये 'प्रकाश आमटे'पेक्षा 'नाना पाटेकर' म्हणून ते जास्त लक्षात रहातात. मंदाताईंचं व्यक्तिमत्व खरंतर अत्यंत खंबीर आणि शांत. चित्रपटात मात्र ते तसं समोर येत नाही. पतीने घेतलेल्या निर्णयात त्याच्या मागून मुकाट चालणारी एक पत्नी अशी त्यांची छाप होते. सोनाली कुलकर्णी यांनी रंगवलेल्या मंदाताई दिग्दर्शकीय भूमिकेतून योग्य आहेत. परंतु, 'मंदाताई' म्हणून त्यांचा वेगळी छाप यात जाणवत नाही. वास्तव जीवनात प्रकाश आमटे यांच्यापेक्षा मंदाताई जास्त प्रॅक्टिकल, अबोल असल्याचं दिसतं. त्याच्या उलट व्यक्तिरेखा सिनेमात दिसते. याला कदाचित सिनेमॅटिक लिबर्टी म्हणायला हवी. डॉ. आगाशे, तेजश्री प्रधान आदींनी आपापल्या भूमिका निभावून नेल्यात.

            एकुणात, चरित्रपट म्हणावे असे विषय घेऊन सिनेमे बनवण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. पण अशी उंची गाठण्याऱ्या व्यक्तिंना चित्रपटातल्या दोन तासांत पडद्यावर साकारण्यासाठी माध्यमाची जी जाण लागते तिचा या चित्रपटात अभाव दिसतो. आमटे दाम्पत्यांचं जगणं,संघर्ष दिसण्याऐवजी त्यांच्या अनुभवांच्या आठवणी केवळ काही पुंजक्यांच्या रुपाने पडद्यावर उतरतात. पटकथ फोकस्ड असती तर ही प्रकाशवाट आणखी उजळली असती. 

Post a Comment

0 Comments