पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत व २५ वर्षाच्या मुलाचे लग्न उरकण्याची लगीनघाई चालू असतानाच पोलिस पोहोचले आणि पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे हा बालविवाह टळला.
याबाबत पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार निर्भया पथकाचे पोसई गजभारे यांना एका निनावी फोनद्वारे कासेगाव येथे बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोसई गजभारे, पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा साधना राऊत यांचे पथक कासेगाव येथे दाखल झाले.
महामाया नगर, कासेगाव, ता. पंढरपूर येथे ११:३० वा. श्रीमती सिंधु अशोक डांगे, रा. मगरवाडी, ता. पंढरपूर (हल्ली रा. गोरेगाव, वेस्ट मुंबई) यांचा २५ वर्षांचा मुलगा व सोमनाथ सदाशिव सोनवणे, रा. उघडेवाडी, ता. माळशिरस यांची १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी यांचा साखरपुडयाचा कार्यक्रम सुरु होता.
अचानक पोलिस आल्याचे समजताच लगीनघाई चे रूपांतर तणावात व गोंधळात झाले. पौरोहित्य करणारे ब्राम्हण प्रल्हाद देशपांडे (रा. कासेगाव) यांच्यासह दोन्ही कडील नातेवाईक भांबावले. मुलाचे वडील व मुलीची आई यांनी आज फक्त साखरपुडा करतोय, मुलीचे वय कायदेशीर विवाह योग्य झाल्यानंतर लग्न करणार असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी सर्वांचे समुपदेशन करून समज दिली.
पोलिसांनी सतर्कपणे केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.





0 Comments