अकोला : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात बार्शीटाकळी व पातूर तालुक्यात जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. प्रशासनाकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी प्रस्ताव शासनाकडे दिला होता.
या दोन तालुक्यांतील १५ हजार ३५१ शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी राज्य शासनाने १० कोटी ४१ लाख रुपयांचा मदत निधी जिल्ह्याला उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्यात जून, जुलै महिन्यात पुरामुळे पिकांचे नुकसान झाले.
पावसामुळे सोयाबीन, कापूस, मूग, उडीद व फळपिकांना फटका बसलेला आहे. ऑगस्ट महिन्यातही पावसाने धुमाकूळ घातला. कापूस व तूर पिकांचे नुकसान झाले. काही ठिकणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने जमिनीही खरडली.
कृषी, महसूल व जिल्हा परिषद या तीन यंत्रणांकडून संयुक्त पंचनामे करण्यात आले. पातूर तालुक्यात ऑगस्ट महिन्यात चार गावांतील ५१ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. २६ हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली.
तर, बार्शीटाकळीत अतिवृष्टीमुळे ७ हजार ६५६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. १२३ गावांमधील १५ हजार ३०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या दोन्ही तालुक्यांतील नुकसान भरपाईसाठी १० कोटी ४१ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.



0 Comments